धुळे : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वन विभागाचे राज्यमंत्री आणि इतर संबंधित १० वरिष्ठांना निवेदन पाठविले आहे.निवेदनात म्हटले आहे की, हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना डीएफओ विनोद शिवकुमार यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. गर्भवती असताना देखील जंगलात तब्बल तीन किलोमीटर चालण्यास भाग पाडल्याने त्यांचा गर्भपात झाला. वन प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने परिसरात केलेले कार्य वरिष्ठांना खपले नसल्याने त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. वन विभागातील तस्करांना लगाम घालण्यासाठी उचललेले धाडसी पाऊल वरिष्ठांना खुपल्याने डीएफओ विनोद शिवकुमार यांनी त्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून छळ केला. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वेळोवेळी तक्रार करूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत सखोल चाैकशी करून संबंधित दोषींवर त्वरित कारवाई करावी. अन्यथा, भटक्या विमुक्त व ओबीसी बांधवांमार्फत राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती वरीष्ठांना पाठविल्या आहेत.फाशीची शिक्षा द्याअमरावती जिल्ह्यातील मेळघाट वनक्षेत्रामध्ये कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास भागा पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय महाराठा महासंघाने केली आहे. याबाबत महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, युवक जिल्हाध्यक्ष भुषण बोरसे, साक्री शहराध्यक्ष विक्रमसिंह काळे, तालुकाध्यक्ष रमेश मराठे, बाजीराव खैरनार, पवन शिंदे, सतीष गिरमकर, सुनील ठाणगे, अमोल साळुंखे, संजय नेतकर, राजेंद्र मराठे, उमेश पवार, आशिष देशमुख, विनोद पाटील, कांतीलाल देवरे, दीपक गिरमकर, साहेबराव पाटील, हरीश मिसाळ आदींनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ही मागणी केली.
आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्येची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:59 IST