गळ्यातील चेन? मोडायची वेळ आली; कसले ब्रेक द चेन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:21+5:302021-04-10T04:35:21+5:30
गेल्या वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्यावर्षी मार्च ते मे असे तीन महिने लॅाकडाऊन असल्याने सर्वच दुकाने बंद ...
गेल्या वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्यावर्षी मार्च ते मे असे तीन महिने लॅाकडाऊन असल्याने सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून व्यापारीवर्ग सावरू लागला असतानाच आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अनियंत्रित झालेली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मिनी लॅाकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा फटका बसू लागला आहे. वारंवार दुकाने बंद असल्याने, काहींना तर सोन्या-चांदीचे दागिने मोडावे लागत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा शासनाने फेरविचार करण्याची गरज आहे.
ठराविक दिवसच सुरू राहिला व्यवसाय कर्ज कसे फेडायचे?
गेल्या वर्षभरापासून अनेकदा लॅाकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकवेळी दुकाने बंद ठेवण्यात आली. ठराविक दिवसच व्यवसाय सुरू राहिला. त्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासानने याचा फेरविचार करण्याची गरज आहे.
नोकरी नसल्याने आम्ही छोटे कटलरीचे दुकान सुरू केले. यातून चांगले उत्पन्न मिळत होते. मुलांचे शिक्षणही सुरू होते. मात्र आता लॅाकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. दुकान सुरू राहण्याऐवजी ते बंदच जास्त असते. यामुळे चिंता वाढली आहे.
- शोभना पाटील, गृहिणी
नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करा, असेच लोकप्रतिनिधी सांगतात. मात्र संसर्ग वाढताच पहिल्यांदा दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे जे उत्पन्न सुरू असते, त्यावरही परिणाम होतो. दुकाने सुरू राहिली म्हणजेच कोरोना वाढतो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
दीपाली भावे, गृहिणी
नोकरदारांना महिन्याच्या शेवटी पगार मिळत असतो. मात्र दुकानदारांना आपले दुकान सुरू ठेवल्याशिवाय पैसा मिळू शकत नाही. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी दुकाने बंद हा पर्याय चुकीचा आहे.
- अंजली वैद्य, गृहिणी
वारंवार दुकाने बंद असल्याने आम्हाला आता सोन्याचे दागिने मोडण्याची वेळ आली आहे. कारण परिवाराचा खर्च चालविण्यासाठी पैशांची नितांत गरज भासते.
जयश्री सोनार, गृहिणी