धुळे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यांवरही शुकशुकाट असून, बसस्थानकातून सकाळी ११ वाजेपर्यंत एकही बस सोडण्यात आलेली नव्हती.रविवार असतांनाही धुळ शहरातील काही चौकात नेहमी गर्दी असते. मात्र २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु असल्याने, शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. रस्त्यावर फक्त पोलीस आणि आरोग्य विभागाने नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांचेच पथक आहे.धुळे मध्यवर्ती बसस्थानकावरही प्रचंड शुकशुकाट आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत या स्थानकातून जवळपास १५० बसगाड्या सुटत असतात. मात्र आज प्रवाशीच नसल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत एकही बस सोडण्यात आलेली नसल्याचे धुळे आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी सांगितले.शहातील किराणा, पानटपरी, हॉटेल व्यावसायिकांनीही बंदत सहभाग नोंदविला आहे. वाहनांच्या वर्दळीने नेहमी गजबजलेला सुरत-नागपूर महामार्गावरही वाहनांची तुरळक गर्दी होती. ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद होते.
धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:19 IST