तुळजापूर : गतवर्षी खरिपात न उगवलेल्या विविध कंपन्यांची सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. यामुळे मदतीसाठी कृषी विभागाकडे एक-दोन नव्हे, तर तब्बल २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांची तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, खरिपाचा दुसरा हंगाम आला, तरी या शेतकऱ्यांना ना प्रशासनाने मदत केली ना कंपनीने. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गतवर्षी जूनच्या सुरुवातीपासूनच तुळजापूर तालुक्यात दमदार पाऊस झाला. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी संकटातून सावत पेरणी योग्य पाऊस झाल्याने, उसनवारी, सावकाराकडून कर्ज काढून एकरी जवळपास १५ ते २० हजार रुपये खर्च करून, विविध नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणाची पेरणी केली, परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. यामुळे शेतकरी हतबल झाले होते. बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीची वेळ ओढावल्यानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बोगस बियाणांबाबत कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली.
तुळजापूर तालुक्यातून तब्बल २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पहिल्या व दुसऱ्या पेरणीचा खर्च शासनाकडून अथवा संबंधित कंपनीकडून मिळेल, या आशेने तक्रारी दाखल केल्या. यानुसार कृषी विभागाच्या तालुकास्तरिय समितीने पंचनामेही केले. यामध्ये जवळपास २६३४.९८ हेक्टर क्षेत्रातील विविध नामांकित कंपनीचे १९७६.९८५ क्विंटल सोयबीन बियाणे उगवले नसल्याचे तालुकास्तरिय समितीच्या अहवालातून पुढे आले होते.
यावरून तालुका कृषी विभागाने बन्सल सिड्स, महाबीज, दादाजी सीड्स, वृंदावन यासह आणखी एका अशा एकूण ५ कंपन्यावर न्यायालयात खटले दाखल केले होते, तसेच पंचायत समिती कृषी विभागाने ८ कंपन्यावर न्यायालयात तर वरदान कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यालाही आता एक वर्षाचा कालावधी लोटत आला असून, अद्याप या शेतकऱ्यांना प्रशासन अथवा संबंधित कंपनीकडून कसलीही मदत मिळालेली नाही.
कोट..........
काही कंपन्यांनी आमच्या परस्पर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. त्याची माहिती आमच्याकडे नाही, महाबीज कंपनी ही शासनाची अधिकृत कंपनी आहे. या कंपनीने काही लॉट निवडून ज्या लॉटचे नुकसान झाले आहे, त्यांना थेट भरपाई दिली आहे. पाच बोगस बियाणे कंपन्यावर न्यायलयात खटले दाखल केले असून, या वर्षी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी बियाणे पेरते वेळी, पेरल्यानंतर यातील मूठभर बियाणे उगवण होईपर्यंत जपून ठेवावे. कोणाची काहीही तक्रार असेल, तर भरारी पथकाकडे दाखल करावी.
- एन.टी. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी
गतवर्षी खरिपात महाबीज कंपनीचे बियाणे पेरले होते. यातील एकही बॅग उगवून आली नसल्याने कृषी विभागाकडे लेखी तक्रार दिली, परंतु खरिपाचा दुसरा हंगाम येत आला, तरी अद्याप कसलीच भरपाई मिळालेली नाही. महाबीजसह अन्य कंपनीविरुद्ध अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु यातील बहुतांशी शेतकऱ्यांना एक रुपयांचीही मदत मिळालेली नाही.
- धन्यकुमार कुलकर्णी, शेतकरी, तडवळा