उन्हं वाढलं, फळ बाजार बहरला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:21+5:302021-03-06T04:30:21+5:30
उस्मानाबाद : थंडीचा कडाका संपल्यानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने बाजारात ...
उस्मानाबाद : थंडीचा कडाका संपल्यानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने बाजारात शरिराला थंडावा देणारी टरबूज, खरबूज, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू आदी फळे दाखल झाली आहेत. कोरोनाच्या धास्तीने सध्या या फळांना मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
घशाला कोरड पाडणार्या उष्णतेत थोडा गारवा मिळावा व आरोग्य थंड व्हावे, म्हणून उन्हाळ्यात फळांना मोठी मागणी असते. ग्रीष्मकालीन ऋतूमध्ये फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून फळविक्रेते बाजारात खरबूज, टरबूज, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, चिकू, संत्रा अशी फळे विक्रीस घेऊन येत असतात. या वर्षी मागील महिन्यापासून बाजारात पाणीदार उन्हाळी फळे दाखल झाली आहेत. थंडीमुळे या फळांना मागणी नव्हती. दोन तीन दिवसांपासून उन्हं वाढू लागले आहे. मात्र मागील दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली आहे. शिवाय, बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला अशा आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या फळांना मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, येत्या काही दिवसांत फळांना मागणी वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत तर टरबूज, खरबूज, चिकू ही फळे स्वस्त आहेत.
प्रतिक्रिया...
उन्हं वाढल्याने बाजारात पाणीदार फळे दाखल झाली आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बाजारात ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे फळांना म्हणावी तशी मागणी नाही.
रईस बागवान, फळ विक्रेते
असे आहेत फळांचे दर
बाजारात सफरचंद १२० ते १८०, डाळिंब १६० ते २००, मोसंबी १००, संत्रा ६० ते ८० रुपये, द्राक्ष ५० ते ६०, चिकू ३० ते ४०, खरबूज ३० ते ४० रुपये प्रतीकिलो दराने विक्री होत आहे. शहाळे ३० रुपये नग, टरबूज ३० ते ४० रुपये नग तर अननस ६० रुपये प्रतिनगाप्रमाणे विक्रीस आहे.