तुळजापूर : तालुक्यातील माळुंब्रा येथे पाझर तलावाच्या निर्मितीनंतर शेताकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. याबाबत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कार्यालयात सुनवण्या घेऊन महसूल विभागाने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सामंजस्यपणातून दीड कि.मी चा नवीन रस्ता करून दिला. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतीची कामे खोळंबली जात होती. शिवाय, दुसऱ्याच्या शेतीतून शेतकरी जाऊ देत नसल्याने दत्तात्रय त्रिंबक माने यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे नवीन रस्ता मिळण्यासाठी पाठपुरावा केला. यावर तहसील कार्यालयात सुनावण्या घेण्यात आल्या. यानंतर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांनी मंडळ अधिकारी यादव, तलाठी यांच्या समवेत शेतीवर जाऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधत चर्चा केली. अखेर सामंजस्यातून हा दीड कि.मी.चा नवीन शेत रस्ता तयार करण्यात आला.