भूम : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची वतीने तातडीने बांधावर जाऊन पंचनामा करावा, अशी मागणी येथील छावा क्रांतिवीर सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सोयबीन, उडीद, कांदा, ऊस या पिकासह इतर पालेभाज्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे याचे तत्काळ पंचनामे करून शेतकरी व शेतमजुरांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा छावा क्रांतिवीर सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना ७ सप्टेंबर रोजी एक दिवस लाक्षणिक उपोषण करेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, छावा क्रांतिवीर सेनेचे युवक तालुकाध्यक्ष गणेश नलवडे, तालुकाध्यक्ष अमृत भोरे, प्रा. डॉ. बिभीषण भैरट, महेश येडे, शरद खडागळे, राहुल ताबारे, सुधाकर सपकाळ, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.