दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. तेव्हा पुणे, हैद्राबाद येथून ऑक्सिजन मागवावे लागले. दररोज जवळपास १९ हजार ५०० लीटर्स ऑक्सिजन लागत होते. तेव्हा दमछाक उडाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने नियोजन सुरू केले. लोकप्रतिनिधींनीही यास चांगली साथ दिली. यामुळे अत्यंत कमी कालावधीत ऑक्सिजन प्रकल्प उभे झाले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयातील १० हजार लीटर्स क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प सुरू आहे. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार लीटर्स क्षमतेचा प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होऊ शकेल.
दरम्यान, हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात ३०० एलपीएम, तर उमरगा येथे ४२० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. परंडा येथे ५०० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाला असून, जोडणी व चाचणी राहिली आहे. जिल्हा रुग्णालयात १००० एलपीएम, कळंब येथे ६०० एलपीएम, तर तुळजापूर येथे ५०० एलपीएम क्षमतेचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. लवकरच त्यांचेही काम सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
खासगी उद्योगांचाही पुढाकार...
धाराशिव कारखान्याने सर्वात आधी ६ हजार लीटर प्रतिदिन ऑक्सिजन उत्पादन सुरू केले आहे. पाठोपाठ नॅचरल शुगर्स कारखान्यानेही १ हजार लीटर्स प्रतिदिन उत्पादन ७ जुलैपासून सुरू केले आहे. रुपामाता ॲग्रोटेकची यंत्रसामग्री प्राप्त होऊन उभारणी सुरू झाली आहे. २५ जुलैपर्यंत हा प्रकल्पही पूर्ण होईल. भैरवनाथ कारखान्यात प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे.
आराखडे तयार करा...
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची गरज शक्यतो स्थानिक पातळीवर भागविली जावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २२ जुलैपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडे तयार करून पाठविण्यास सूचित केले आहे. यामध्ये रुग्णालयाची क्षमता व गरज तपासून त्या नोंदी अंतर्भूत केल्या जातील.