कळंब : पावसाळ्यातील केवळ हस्त व चित्रा ही दोनच नक्षत्रे शिल्लक राहिली असताना तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या दहापैकी रायगव्हाण मध्यम प्रकल्पासह इतर पाच तलाव कोरडेठाक असून, केवळ तीन तलावांत दखलपात्र तर दोन तलावाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तलावासह अन्य साठवण स्त्रोतांचीही पाण्याअभावी बिकट अवस्था असल्याने भविष्यात प्रतिकूल परिणाम भोगावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यात रायगव्हाण मध्यम प्रकल्पासह देवधानोरा, शिराढोण, कोठाळवाडी, ढोराळा हे चार लघु पाटबंधारे प्रकल्प तर भाटसांगवी, आडसूळवाडी, येरमाळा, मलकापूर व चोराखळी हे पाच साठवण तलाव आहेत. याशिवाय लगतच्या मांजरा प्रकल्पाच्या बॅकवॉटरवर बोरगाव (ध), सेलू, मांडवा येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांचाही तालुक्यातील शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरित्या फायदा होत असतो. यावर्षी तालुक्यात मान्सूनचे आगमन तब्बल एक महिना उशिरा झाले. तदनंतरही पावसाने दडी मारली. पुन्हा आॅगस्ट अखेर आठ-दहा दिवस समाधानकारक पाऊस झाला. यानंतर जवळपास २५ दिवसांपासून तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने तलाव क्षेत्रातील नद्या जास्त काळ वाहत्या झालेल्या नाहीत. तालुक्यातील येरमाळा भागातील येरमाळा, चोराखळी व मलकापूर या तीन तलावात दखलपात्र पाणीसाठा झालेला आहे. येरमाळा साठवण तलावात १.२८६ दलघमी उपयुक्त पाणी साठवण क्षमता असून, गुरूवारअखेर यामध्ये १.०७२ दलघमी पाणीसाठा होऊन हा तलाव ८३ टक्के भरला आहे. चोराखळी साठवण तलावाची क्षमा ३.१५७ दलघमी असून, सद्यस्थितीत १.९०२ म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर ०.८६८ दलघमी साठवण क्षमता असलेला मलकापूर साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तीनच तलावात दखलपात्र व समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. (वार्ताहर)
रायगव्हाणसह पाच तलाव अद्यापही कोरडेठाक
By admin | Updated: September 26, 2014 01:20 IST