निपाणी येथील अशोक राजेंद्र गुंड (२९) या शेतकऱ्याची पूर्णतः शेतीवर मदार आहे. यंदा त्यांनी शेतात सोयाबीन पिकावर भर दिला होता. दरम्यान, पावसाने २५ दिवस विश्रांती घेतल्याने त्यांचे ५ एकरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले होते. यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी २० ऑगस्ट रोजी आपल्या शिंदेवाडी शिवारातील शेतात विष प्राशन केले. यानंतर त्यांना प्रथम मुरुड, तेथून लातूर येथे उपचारार्थ हलवले. यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने हैदराबाद येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच अशोक यांची सोमवारी सायंकाळी प्राणज्योत मालवली. मंगळवारी त्यांच्यावर निपाणी येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई असा परिवार आहे.
व्हिडिओतून दाखविले नुकसान...
आत्महत्या केलेले तरूण शेतकरी अशोक गुंड यांनी नुकताच एक व्हिडिओ तयार केला होता. यात पावसाच्या अभावाने पिकांचा धुराळा झाला आहे. यात लाईटही टिकत नाही. सरकारने याकडे लक्ष द्यावे, पंचनामे करावेत, विमा कंपनीला माहिती द्यावी, असे सांगत हतबलता व्यक्त केली होती. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.