वाळलेल्या पिकात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:46 PM2017-08-14T17:46:41+5:302017-08-14T17:46:57+5:30
पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे या हंगामात काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. यातूनच उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतक-याने पाण्या अभावी वाळलेल्या पिकात चक्क जनावरे सोडून दिली.
ऑनलाईन लोकमत
उस्मानाबाद, दि. १४ : पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे या हंगामात काहीच उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. यातूनच उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील शेतक-याने पाण्या अभावी वाळलेल्या पिकात चक्क जनावरे सोडून दिली.
यंदा मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतक-यांनी मोठ्या अपेक्षेने खरिपाच्या पेरण्या केल्या. उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील रमेश पंडित तनमोर यांनी देखील साडेतीन एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तूर या पिकाची पेरणी केली होती. सुरूवातीच्या काळातील पावसामुळे पिकांची वाढही समाधानकारक होती. परंतु, जुलै महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी करपून गेले. आता यापुढील काळात पाऊस झाला तरी या पिकांना त्याचा काहीच उपयोग होणार नसल्यामुळे हताश झालेल्या रमेश तनमोर यांनी सुकलेल्या या पिकात जनावरे सोडून दिली.
तनमोर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात सोयाबीन व पट्टा पध्दतीने तुरीची लागवड केली होती. त्यांना खत, बी-बियाणे, पेरणी व कोळपणी, फवारणी यासाठी सुमारे पंचेवीस हजारापर्यंत खर्च झाला. तनमोर यांच्या कुटुंबात सहा सदस्य असून, या सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, पावसाअभावी हा हंगाम हातचा गेल्यामुळे या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.