बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या १० दिवसांनी एक नवविवाहिता आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने ती पतीसोबत बाजारात गेली आणि तिथून पतीला चकमा देऊन पसार झाली. ही महिला पळून जाताना आपल्यासोबत ८ लाख रुपयांचे दागिने आणि काही इतर मौल्यवान गोष्टी घेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. ही घटना फुलवारिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
कोयला देवा टोला गावातील रहिवासी मंटू कुमार रजक यांनी आपली नवविवाहित पत्नी चुलबुली देवी हिच्या विरोधात फुलवारिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंटूने पोलिसांना सांगितले की, तो आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत १५ जून रोजी आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी कुसौंधी बाजारात गेला होता. बाजारात गेल्यावर पत्नीने एक बहाणा केला आणि दोघांना एका दुकानात पाठवून स्वतः तेथून पसार झाली.
पती मंटूने सांगितले की, त्याने सुमारे ७-८ दिवस आपल्या पत्नीचा शोध घेतला. या काळात त्याला समजले की, चुलबुली देवीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसौंधी गावातील रहिवासी आदित्य कुशवाहा याला या प्रकरणात आरोपी ठरवले आहे. मंटूचे म्हणणे आहे की, चुलबुली देवीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला फसवून आपल्या प्रियकरासोबत पळ काढला आहे. मंटू आणि चुलबुली यांचे लग्न ५ जून रोजीच झाले होते.