इंदूर - हनीमूनसाठी मेघालयला गेलेले सोनम आणि राजा रघुवंशी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती. पोलिसांनी या जोडप्याच्या शोधासाठी दिवसरात्र एक केले. दुर्गम भागात पथके पाठवली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु हाती काहीच लागले नाही. सर्वकाही अंधारात तीर मारण्यासारखे झाले होते. पोलीस प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवत होती मात्र कुणालाही काहीच कळत नव्हते. तेव्हा या प्रकरणात एन्ट्री होते स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी याची...ज्याच्या एका माहितीमुळे पोलिसांना या प्रकरणाच्या आणखी जवळ नेले. त्यातून सोनम रघुवंशीचे षडयंत्र आणि राजाच्या हत्येमागचा चेहरा उघड झाला.
हिंदी समजली नाही, पण शंका आली
अल्बर्ट पीडी नावाच्या गाईडने पोलिसांना सांगितले की, २२ मे रोजी सोनम आणि राजा यांच्यासोबत अन्य ३ युवक होते. जे नोंग्रियाटहून मावलखियाट ३ हजार पायऱ्या चढून जात होते. राजासोबत ३ जण पुढे चालले होते तर सोनम त्यांच्या मागे होती. ते सगळे हिंदीत बोलत होते. मला हिंदी फारसे येत नाही परंतु काही ठीक नाही असं वाटले. सोनम यांनी अल्बर्ट यांना सोडून भावानसाई नावाचा दुसरा गाईड ठेवला होता ज्याने त्यांना शिपारा होमस्टे पर्यंत सोडले होते. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ऑपरेशन हनीमून नाव दिले. यात एकूण १२० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काम करत होते.
फोटो न टाकण्यावरही आला संशय
राजा रघुवंशीच्या हत्येचे कोडे सोडवताना पोलिसांच्या मनात आणखी एक संशय निर्माण झाला जेव्हा हनीमूनला आलेल्या सोनमने त्यांच्या सोशल मीडियावर एकही फोटो पोस्ट केला नव्हता. एखाद्या नवविवाहित जोडप्यात ही गोष्ट असामान्य आहे. बहुतांश कपल हनीमून ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकतात परंतु सोनम आणि राजा यांचा एकही फोटो समोर आला नाही. गाईडकडून मिळालेल्या सुगाव्यानंतर ही पहिलीच गोष्ट होती ज्यामुळे टीमचा संशय बळावला.
मर्डरनंतर राजाच्या अकाऊंटवर भावूक पोस्ट
त्याहून मोठी बाब म्हणजे २३ मे दुपारी २.२५ मिनिटांनी राजाच्या सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड करण्यात आली त्यात सात जन्मो का साथ असा उल्लेख करण्यात आला. ही पोस्ट त्यावेळी टाकली होती जेव्हा राजाची हत्या करण्यात आली. सोनमने ही पोस्ट टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून राजा जिवंत आहे आणि सर्वकाही सुरळीत आहे हे दिसून येईल असा अंदाज पोलिसांना आला.
घटनास्थळावरून १० किमी अंतरावरील CCTV फुटेज
तपासावेळी पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले. ज्यात सोनम आरोपी आकाश, विशाल आणि आनंदसोबत क्राइम सीनपासून जवळपास १० किमी अंतरावर बोलताना दिसले. त्याशिवाय घटनास्थळी जे काही पुरावे सापडले त्यामुळे हत्येत सोनमचा सहभाग असल्याची पुष्टी झाली. सोनमने जाणुनबुजून तिचा रेनकोट आकाशला दिला होता. त्यावर रक्ताचे डाग होते, जे ६ किमी दूर अंतरावर झुडूपात सापडले. राजाच्या हत्येनंतर पुरावे मिटवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
१० दिवसांत रचला कट
या घटनेचा तपास करताना लग्नाच्या अवघ्या १० दिवसानंतरच राजाच्या हत्येचा कट रचला गेल्याचे उघड झाले. सोनम सातत्याने राज कुशवाहा आणि इतर आरोपींच्या संपर्कात होती. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले होते जेणेकरून एकाच परिसरात संशय येऊ नये. हत्येचा हेतू एकच होता राजाचा काटा काढून सोनमला प्रियकर राजसोबत लग्न करायचे होते असं पोलिसांनी म्हटलं.