West Bengal Crime: आपल्या पालकांची हत्या करणाऱ्या बेरोजगार सिव्हिल इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांच्या अभावामुळे तो त्रस्त होता. 'रोहिंग्या समर्थक' असलेला हुमायू एकांतवासात राहत होता आणि धार्मिक साहित्यात रमलेला होता. तो म्यानमारमधून पळून जाण्याच्या तयारीत होता. हुमायून कबीर असं त्याचे नाव असल्याचे समोर आलं आहे. कबीरला गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील पूर्वा वर्धमान येथून अटक करण्यात आली होती.
जादवपूर विद्यापीठातून पदवीधर झालेल्या हुमायून कबीरने २८ मे रोजी पूर्व बर्दवानमधील मेमारी येथील त्याच्या घरी त्याच्या वृद्ध पालकांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्याच्या पालकांचे मृतदेह रस्त्यावर ओढत आणले होते. त्यानंतर तो तिथून पळून गेला आणि सुमारे १०७ किमी अंतरावर असलेल्या बोनगाव येथील एका अनाथाश्रमात पोहोचला. तिथल्या चार कर्मचाऱ्यांवर त्याने चाकूने हल्ला केला होता. पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.
हुमायून कबीरचे वडील पूर्व बर्दवानच्या मेमारी शहरात गिफ्टचे दुकान चालवायचे. त्यांच्या कुटुंबाकडे भरपूर शेती होती. २०१२ मध्ये कबीरने जाधवपूर विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने मुंबई, दिल्ली आणि नोएडा येथे काम केले. कबीरचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर त्याची वागणूक बदलू लागली. तो हळूहळू इतरांपासून स्वतःला वेगळे करू लागला. या काळात त्याला नोकरीही गमवावी लागली.
या वर्षाच्या सुरुवातीला, तो अनेक महिने बेपत्ता झाला. तो हिमाचल प्रदेशला गेला होता. त्याच्या वडिलांनी खूप प्रयत्नांनंतर त्याला शोधून काढले आणि त्याला परत आणले. पुढील काही महिन्यांत, त्याचे वर्तन खूप बदलले. त्याने धार्मिक आणि जिहादी साहित्य वाचण्यास सुरुवात केली. या काळात, त्याने त्याच्या पालकांवर धार्मिक कार्यात रस नसल्याबद्दल रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याला त्याच्या पालकांना स्वर्ग मिळवून द्यायचा होता. त्याने त्यांना मारण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. २८ मे रोजी त्याने दोघांनाही संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच्या वडिलांचे मनगट कापले. आणि नंतर जेव्हा त्याची आई ओरड ऐकून आली तेव्हा त्याने तिलाही ठार मारले. यानंतर कबीर राणाघाटला गेला आणि तिथून तो ट्रेन पकडून बोनगावला पोहोचला. जे भारत-बांगलादेश सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. येथून तो म्यानमारला पळून जाण्याचा विचार करत होता. मात्र अनाथाश्रमातील चार लोकांवर हल्ला केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आणि त्याचा प्लॅन फसला.