गया - बिहारच्या गया जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी काही दबंग गुंडांनी एका डॉक्टरला झाडाला बांधून बेदम मारलं आहे. हे डॉक्टर एका बलात्कार पीडितेच्या घरी उपचार करण्यासाठी गेले होते. पीडितेच्या कुटुंबावर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी हे गुंड दबाव टाकत होते. त्यात पीडितेच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टर जितेंद्र यादव यांना घरी बोलावण्यात आले. तेव्हा गावातील १०-१२ गुंडांनी डॉक्टरांना पकडले. त्यानंतर त्यांना फरफटत नेत झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा काही गावकऱ्यांनी लपून व्हिडिओ बनवला तेव्हा ही घटना उघडकीस आली.
हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोहचले. तिथे रक्तबंबाळ झालेल्या डॉक्टरांना रस्सीतून सुटका केली. त्यानंतर डॉक्टरांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. माहितीनुसार, बलात्कारातील आरोपी पीडितेच्या कुटुंबाला खटला मागे घेण्यासाठी धमकी देत होते. त्याचवेळी पीडितेची आई आजारी पडली. आईच्या उपचारासाठी डॉ. जितेंद्र यादव यांना घरी बोलवण्यात आले. त्यावेळी संतापलेल्या गुंडांनी मिळून डॉक्टरला फरफटत नेले आणि झाडाला रस्सीने बांधले. या गावगुंडांची दहशत इतकी आहे की कुणीही उघडपणे त्यांना विरोध करण्याची हिंमत केली नाही. काही लोकांनी घाबरून लपत लपत हा व्हिडिओ बनवला.
या व्हायरल व्हिडिओत डॉक्टर जितेंद्र यादव यांना झाडाला बांधून मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत. बिहारमधील या घटनेने विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केलेत. त्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या घटनेची तुलना तालिबानी कृत्याशी केली आहे. तेजस्वी यांनी व्हिडिओ शेअर करत हे तेच डॉक्टर आहेत, जे रेप पीडितेच्या आईवर उपचार करायला गेले होते तेव्हा गुंडांनी त्यांना मारहाण केली असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, बिहारमध्ये तालिबानपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. गया जिल्ह्यात बलात्कार पीडितेच्या आईवर उपचार करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला आरोपींनी झाडाला बांधून इतके मारले की ते रक्तबंबाळ झाले. २० वर्षाच्या भष्ट एनडीए सरकारमध्ये पोलीस आणि प्रशासन गुन्हे रोखण्यास, गुन्हेगारांना आळा घालण्यात आणि न्याय मिळवून देण्यात असक्षम आहेत. ज्याची जिथे मर्जी तिथे कायदा लोक हातात घेत आहेत. बिहारमध्ये अराजक स्थिती आहे. मुख्यमंत्री बेशुद्ध आहेत, सरकार नशेत आहे. अधिकारी, मंत्री खजिना लुटण्यात व्यस्त आहे असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.