खैरागड - छत्तीसगडच्या खैरागड गंडई जिल्ह्यात एक नवविवाहित जोडपे सासरी जाताना अचानक बेपत्ता झाले आहे. २८ वर्षीय नरेंद्र वर्मा आणि २५ वर्षीय ट्विंकल वर्मा यांचे अलीकडेच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्न झाले होते. दोघेही १४ जून रोजी चकनार इथल्या मुलीच्या माहेरी निघाले होते. परंतु तिथे पोहचलेच नाही. नातेवाईकांनी १७ जून रोजी या दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली. या दोघांचेही मोबाईल बंद आहेत त्यामुळे त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकत नाही. याबाबत पोलिसांनी मोबाईल फोन ट्रेस करणे सुरू केले आहे. ज्याठिकाणाहून ते बेपत्ता झालेत तिथेही सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने कुटुंबाला मोठी चिंता सतावली आहे.
माहितीनुसार, १४ जून रोजी या दोघांसोबत अखेरचे बोलणे झाले होते. तेव्हापासून दोघांचा नंबर बंद आहे. काहीच संपर्क नाही. ट्विंकलचे वडील चतुर्भुज जंघेल यांनी म्हटलं की, ते दोघे घरी पोहचल्यावर फोन करतील असं आम्हाला वाटत होते परंतु खूप तास झाले तरी त्यांचा फोन आला नाही त्यामुळे चिंता लागली. तर १७ जून रोजी छुईखदान पोलीस स्टेशनला बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आहे असं नरेंद्रच्या वडिलांनी सांगितले. या दोघांचे मोबाईल पोलिसांकडून ट्रेस केले जात आहेत.
हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत. नरेंद्र आणि ट्विंकल यांच्या लग्नाला आता काहीच दिवस झालेत. त्यानंतर हा त्यांचा पहिला प्रवास होता. अखेर १४ जूनला काय झाले, ते एखाद्या अडचणीत सापडलेत का की अन्य काही कट आहे हे प्रश्न कुटुंबाला सतावू लागले आहेत. सध्या पोलीस प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास करत आहे परंतु अद्याप कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही.
सोनम-राजा प्रकरणानं दहशत
मागील काही दिवसांपासून देशात सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण सतत चर्चेत आहे. या प्रकरणात सोनम-राजा लग्नानंतर काही दिवसांत हनीमूनसाठी मेघालयला गेले होते परंतु २३ मे पासून हे जोडपे अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जूनच्या आसपास राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी सोनम रघुवंशीने सरेंडर करताच सगळा प्रकार उघडकीस आला. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केल्याचे समोर आले. राजाची हत्या करण्यासाठी सोनम आणि राजने तीन मित्रांना सुपारी दिली होती. त्यानंतर मेघालयात राजा रघुवंशीला एकटे गाठून सोनम आणि तिघांनी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून ते फरार झाले. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत. त्यातच छत्तीसगडमधील हे नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने अनेकांच्या मनात दहशत पसरली आहे.