जयपूर - राजस्थानच्या जयपूर येथे १० महिन्यापूर्वी पतीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक केली आहे. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराने छळलेल्या मृत्यूला कवटाळलं असल्याचे तपासात समोर आले. लग्नाच्या काही काळानंतरच पत्नीने पतीपासून अंतर राखले आणि प्रियकरासोबत मिळून पतीचा छळ करू लागली. पत्नीकडून होणारा टॉर्चर सहन न झाल्याने अखेर पतीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले.
ऑगस्ट २०२४ मध्ये केली होती आत्महत्या
माहितीनुसार, माँ वैष्णोदेवी कॉलनीत राहणाऱ्या ३२ वर्षीय प्रकाश शर्माने १३ ऑगस्ट २०२४ रोजी आत्महत्या केली होती. तपासात त्याची पत्नी चंचल शर्मा आणि राकेश सैनी नावाच्या युवकाचे अफेअर सुरू असल्याचे पुढे आले. २०१७ साली प्रकाशचं चंचलसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच पत्नी चंचलने पती प्रकाशपासून अंतर राखले. तिने प्रियकर राकेशसोबत मिळून पतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
सुरुवातीला पती-पत्नी करधनी परिसरातील वैघजी चौकात राहत होते. त्याचवेळी चंचल आणि राकेशची ओळख झाली. प्रकाशने त्याला विरोध केला असता चंचलने राकेशसोबत मिळून त्याला मारहाण केली होती. इतकेच नाही तर प्रकाशचा सगळा पगारही चंचल राकेशच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करत होती. १३ ऑगस्टच्या दिवशी चंचलने प्रकाशच्या खात्यावरून ३६ हजार रुपये राकेशच्या बँक खात्यात पााठवले आणि त्याला आणखी ३ लाख पाठवण्यासाठी दबाव आणला. या छळाला कंटाळून प्रकाशने विष प्यायले. त्याची तब्येत ढासळली तेव्हा त्याला चिरायु हॉस्पिटलमध्ये आणले गेले. त्यानंतर तिथून मणिपाल रुग्णालयात नेत त्याच्यावर उपचार केले परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणात मृत प्रकाशच्या आईने ३ जानेवारी २०२५ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा पत्नीच्या जबाबात विरोधाभास आढळला. पत्नीने राकेशच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचे पुरावेही समोर आले. त्याच आधारे ६ जून रोजी चंचल आणि राकेश या दोघांना पोलिसांनी अटक केली.