जालना : मुंबई ते नागपूर या आठ पदरी अशा स्वप्नवत समृद्धी एक्स्प्रेस वेचे काम लवकरच सुरू होणार असून, यासाठीची प्राथमिक माहिती पूर्णपणे संकलित करण्यात आली असून, बदनापूर व जालना तालुक्यातील सुमारे २५ गावांतील शेतकऱ्यांसाठी हा समृद्धीचा मार्ग ठरणार आहे. सोबतच जालना शहरालगत स्मार्टसिटी होणार असल्याने वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा अतंर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुमारे ३० हजार कोटी रूपयांचा हा सुपर कम्युनिकेशन वे होणार आहे. या महामार्गामुळे २५ गावांतील शेतकऱ्यांची हजारो एक्कर जमीन संपादित होणार असली तरी या शेतकऱ्यांचा मोठा विकास यातून होणार आहे. स्मार्टसिटी अंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक सेवा सुविधा तसेच रोजगार मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या संपादित होणाऱ्या जमिनीला बागायती व जिरायतीनुसार दर मिळणार आहे. तसेच काही ठराविक वार्षिक रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विदर्भ आणि मराठवाडासारख्या दुष्काळी जिल्ह्यांतून हा मार्ग जात असल्याने परिसराचा कायापालट होणार आहे. आठ पदरी रस्ता असल्याने हा मेगा प्रोजेक्ट ठरणार आहे.