औरंगाबाद : याशिवाय जालना, नांदेड, नागपूरकडून येणारी आणि पुण्याकडे जाणारी वाहने जालना रोडवरूनच ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. हा ताण कमी होण्याच्या दृष्टीने या मार्गावर सिडको बसस्थानक, मोंढा नाका आणि बाबा पंप चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. आगामी कालावधीत वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हे तीनही उड्डाणपूल महत्त्वाचे ठरणार असले तरी त्यांची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कारभारामुळे सध्याच्या घडीला तरी वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळाच्या या ‘चलाखी’मुळे हे पुलाचे काम म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनले आहे. एक तर आधीच अरुंद साईड रोड, त्यातच दोन्ही बाजूचे व्यापारी रस्त्यावरच वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे या पुलाच्या बाजूला क्षणोक्षणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सततच्या खोळंब्यामुळे वाहनचालक वैतागून गेले आहेत. आजघडीला नियमांना बगल देऊन तयार केलेले पर्यायी रस्ते अरुंद पडत आहेत. त्यामुळे मोंढानाका, बाबा पेट्रोलपंप चौक येथे रस्त्यावर प्रचंड ताण येत आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ७ मीटरचे पर्यायी रस्ते तयार करणे आणि त्याची देखभाल, दुरुस्ती करणे याचा कंत्राटात समावेश आहे. एक लेन जवळपास ३.५ मीटर एवढे असते. मुरूम, खडी यांचा वापर करून हे रस्ते केले पाहिजेत. पुलाच्या एका बाजूचा पर्यायी रस्ता ७ मीटरचा म्हणजे दोन लेनचा आणि जवळपास २५ फुटांचा असावा. दोन्ही बाजू मिळून ५० फुटांचा पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक आहे. शिवाय उभारण्यात येत असलेले उड्डाणपूल प्रत्येकी चार लेनचे आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडी’च्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिली.
नियमांची लावली ‘वाट’
By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST