औरंगाबाद : महावितरण कंपनीने जायकवाडीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीवरून लपून-छपून दोन नवीन वीज जोडण्या उद्योगांना दिल्यामुळे ढोरकीन सब-स्टेशनवर विजेचा लपंडाव होतो आहे. १ तारखेपासून आजपर्यंत दोन दिवस ५-५ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे औरंगाबादकरांना सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेपासून ढोरकीन बुस्टर पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ६ आॅक्टोबर रोजी कमी दाबाने, उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने कळविले आहे. ढोरकीन सब-स्टेशनवर १५ नवीन वीज खांब उभारणे आणि लाईन टाकण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च मनपाने जून २०१४ मध्ये महावितरण कंपनीला दिला. परंतु महावितरणने त्याचा फायदा घेऊन दोन नवीन कनेक्शन उद्योगांना देऊन टाकले. परिणामी पाणीपुरवठा यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. शहराला सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मागील आठवड्यात दोन वेळा ढोरकीन सब-स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज यंत्रणा सक्षम न झाल्यामुळेच ढोरकीन येथे वीजपुरवठा खंडित झाल्याचे स्पष्ट आहे. ढोरकीन, जायकवाडी आणि फारोळ्याला दोन सब-स्टेशनवरून वीजपुरवठा होतो. ढोरकीनच्या बुस्टरला वीजपुरवठा करणाऱ्या सब-स्टेशनमधील मनपाच्या लाईनवर काही उद्योगांचे वीज कनेक्शन होते. त्यामुळे ढोरकीनचा वीजपुरवठा खंडित होत असे. मनपाला नवीन लाईन हवी असेल तर १५ लाख रुपयांचा खर्च लागेल, असा महावितरणचा प्रस्ताव होता. त्यानुसार पालिकेने जून महिन्यात १५ लाख रुपये दिले.
पाणीपुरवठ्याची वीज उद्योगांना!
By admin | Updated: October 6, 2014 00:44 IST