श्रीक्षेत्र माहूर : शहरातील पवित्र श्री रेणुकादेवी संस्थानवरील शासनाने मंजूर केलेल्या ४ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीतून होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे़ शेवटच्या टप्प्याची टेस्टींग सुरू असून येत्या महिनाभरात योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग रेणुकादेवी संस्थानकडे हस्तांतरित करणार असल्याने रेणुकादेवी मंदिरावरील पाणीसमस्या कायमची निकाली निघाली आहे़ श्रीक्षेत्र माहूरगडावरील देवस्थानावरील पाणीटंचाई समस्या लक्षात घेवून स्पेशल देवस्थानासाठी ४ कोटी २७ लाख रुपयांची नळयोजना पैनगंगा नदीवरून मंजूर केली होती़ नळ योजनेत पैनगंगा नदीवर उद्भव विहीर बांधणे, गणेश टेकडीपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी आणणे, गणेश टेकडीवर पाणी शुद्धीकरण प्लान्ट बसविणे व येथून सर्व देवस्थानावर पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचविणे, परंतु पहाडदर्या खोर्यातून पाईपलाईन टाकणे हे जिकिरीचे काम प्राधिकरणाने कठीण परिश्रम घेवून हाताळले़ योजनेवरील खर्च, विद्युत देयक, मेन्टेनंस इत्यादी वस्तूंचे पालकत्व स्वीकारण्यास कोणीही तयार नसल्याने श्री रेणुकादेवी संस्थानचे प्रशासक मंडळाचे प्रशासक तथा उपजिल्हा अधिकारी अभिजित चौधरी, विनायक फांदाडे, भवानीदास भोपी यांच्याशी जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आऱएस़ लोलापोड यांनी चर्चा करून संपूर्ण कामाची पाहणी केली व योजना पूर्ण करून सूचारू रुपात चालू करून देण्याचे आश्वासन दिले़ महिनाभरापासून संस्थानवर पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात होत आहे़ या योजनेत गणेश टेकडी येथे १५० मि़मी़ व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पाणी आणून एक दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्रासह रेणुकादेवी संस्थानवर ६५ हजार लिटर क्षमतेचे साठवणूक जलकुंभ तयार करून त्याचा वापरही सुरू करण्यात आला असून टेस्टींग अंतर्गत ही योजना पूर्ण क्षमतेने चालवूनच टेस्टींग घेण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता आऱएस़ लोलापोड यांनी दिली़ टेस्टींग घेताना लोलापोड यांच्यासह कार्यकारी अभियंता जे़बी़ पालकर, उपविभागीय अभियंता एस़आऱ भागानगरे, उपविभागीय अधिकारी ए़एऩ अंकुशे, शाखा अभियंता पी़व्ही़ जोशी यांची उपस्थिती होती़ तर पंपचालक शंकर मुकटे, महेंद्र ताडपेल्लीवार, शेख जलाल भाई, यु़डी़ अडबालकर यांनी पूर्ण क्षमतेने गडावर पाणी पोहोचविण्याचे प्रात्यक्षिक सर्वांसमक्ष केल्याने येणार्या भाविकांना भविष्यात भरपूर पाणी उपलब्ध राहणार असल्याने अधीक्षक अभियंता आऱएस़ लोलापोड, श्री रेणुकादेवी संस्थानचे प्रशासक मंडळ तसेच कार्यालय अधीक्षक पी़ डी़ चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले़ (वार्ताहर) यात्रा काळात मुबलक पाणीपुरवठा या योजनेद्वारे श्री रेणुकादेवी संस्थान, श्री दत्तशिखर संस्थान, श्री अनुसया माता मंदिर व श्री देवदेवेश्वर संस्थान या मंदिरावर पाणी पोहोचणे अपेक्षित होते़ यापैकी सन २०१० मध्ये योजना कार्यान्वित झाल्यानंतर सन २०११ पर्यंत वर्षभर प्राधिकरणाने सर्व देवस्थानांना मुबलक पाणीपुरवठा केला़ मध्यंतरी काही कारणास्तव सन २०१२-१३ मध्ये वरील देवस्थानांना यात्राकाळात भरपूर पाणीपुरवठा करण्यात आला़
माहूरगडावरील पाणीप्रश्न मार्गी
By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST