बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात आहे. दरम्यान, सात जून पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. वेळेवर पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: महिनाभरानंतर भाजीपाल्याचे भाव वाढतात. कारण पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आवक कमी होते परिणामी भाव वाढतात. परंतु यंदा परिस्थिती वेगळी झाली आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे, कोथींबीर, टोमॅटो, लसूण, अद्रक याचे भाव वाढले असल्यामुळे हातचे राखूनच खरेदी करीत आहेत. सकाळच्या वेळी भाजीमंडईत भाज्यासाठी आधी पैसे मोजावे लागत असल्याने अनेकजण सायंकाळी सहाच्या सुमारास भाजी मंडईत खरेदीसाठी जात आहेत. सायंकाळच्या वेळी काही प्रमाणात भाजीपाला स्वस्त मिळत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. एकंदरीत या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (प्रतिनिधी)
पालेभाज्यांचे भाव वाढले दुपटीने !
By admin | Updated: June 15, 2015 00:07 IST