छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशन रोडवरील वेदांत हॉटेल मालमत्तेच्या लिलावातून माघार घेतल्याचे पत्र सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाईज या कंपनीने सादर केले नाही. २५ टक्के रक्कम भरण्यासाठी शुक्रवार २० जून ही शेवटची मुदत होती. मुदतीच्या आत रकमेचा भरणा झाला नसल्याने लिलाव रद्द झाला, असे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात प्रशासनाने वेदांत हॉटेल मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. त्यात सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाईज कंपनीने सर्वोच्च बोली लावली. मात्र, विरोधी पक्षाने लिलाव प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर ‘सिद्धांत’ने या प्रक्रियेतून माघार घेतली. ‘सिद्धांत’च्यावतीने लगेचच माघार घेतल्याचे प्रशासनाला पत्र देईल, असेही जाहीर करण्यात आले होते. परंतु, त्यांच्याकडून माघारीचे पत्र प्रशासनाकडे आले नाही. दरम्यान, लिलाव प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या निर्मल हॉलिडे होमने सिद्धांतने लावलेल्या सर्वोच्च बोली एवढ्या किमतीत हॉटेल खरेदी करण्याची इच्छा लेखी स्वरूपात प्रशासनाला कळविली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने देखील बोलीपेक्षा ५ लाख रुपये जास्त म्हणजे ६४ कोटी ८८ लाख रुपयांत खरेदी करण्याची इच्छा लेखी स्वरूपात कळविली आहे.
पुढच्या आठवड्यात अहवाल देऊसिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाईज कंपनीला २० जूनपर्यंत २५ टक्के रक्कम भरण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी पैसे न भरल्याने लिलाव प्रक्रिया रद्द झाली आहे. इतर दोघांनी जुन्या बोलीपेक्षा अधिक रकमेत ती मालमत्ता खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. याचा २५ जून रोजी न्यायालयासमोर अहवाल सादर केला जाईल. न्यायालयच विक्री किंवा नव्याने लिलाव प्रक्रियेबाबत निर्णय घेईल. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही होईल.- डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी.