छत्रपती संभाजीनगर:वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नांदेड, परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे ५ वाजता निघणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. पूर्वी उपलब्ध असलेली सकाळची वेळ आता बदलल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कार्यालयीन प्रवाशांचे नियोजन डगमगले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराला दर्जेदार व वेळेत पोहोचणारी रेल्वे सेवा मिळणे गरजेचे आहे. पूर्वी वंदे भारत सकाळी सुमारे ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारपूर्वी पोहोचत असे. त्यामुळे अनेकांसाठी ती कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरत होती. मात्र, आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही रेल्वे नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल, परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल आणि मुंबई येथे दुपारी २. २५ वाजता पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासाच्या वेळेत बदल झाला नसून मुंबई येथून दुपारी १. १० वाजता निघून छत्रपती संभाजीनगरात सायंकाळी ७. ०५ वाजता पोहचेल. तर जालना ८ . ०५ वा. , परभणी ९. ४३ वा. येऊन नांदेड येथे पोहचण्याची वेळी १०. ५० वाजेची आहे. गाडी नांदेडहून येणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. नवीन वेळ गैरसोयीची असल्यामुळे शहरातील प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक लवकरच लागू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रवाशांमध्ये संतापवंदे भारतसारखी जलदगती ट्रेन ही 'हब टु हब' कनेक्शनसाठी असते. मोठ्या शहरांना त्वरित जोडणारी सेवा सर्व प्रवाशांना फायद्याची ठरते. मात्र, नवीन वेळापत्रकामुळे वेळेत पोहोचणे हे मुख्य वैशिष्ट्य वंदे भारत एक्सप्रेसने गमावले आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या शहराला सुयोग्य वेळेची रेल्वे सुविधा मिळू नये हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्यामुळे या सेवेचा मूळ उद्देशच हरवत चालला असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.
सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करावीसंभाजीनगरहून मोठ्या प्रयत्नांनंतर मुंबईसाठी सकाळची गाडी मिळाली होती जी कार्यालयीन कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीची होती. मराठवाड्यातील राजकारण्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आता ना धड जनशताब्दी ना वंदेभारत संभाजीनगरसाठी सोयीची ठरणार आहे. एकीकडे मोठे उद्योग शहरात येत असतांना चांगली सोयीची रेल्वेसेवा नसणे शहराच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शहरासाठी सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करून घ्यावी.-स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती