\सिल्लोड : स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या नवरदेवावर काळाने झडप घातली. सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर भरधाव ट्रकने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह दोन जण घटनास्थळीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना एकता पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी साय. ५ वाजेच्या सुमारास घडली. रवी भाऊसाहेब मुरकुटे (वय २६, रा. वांगी खुर्द, ता. सिल्लोड) आणि मंगेश नारायण गाडेकर (वय २९, रा. पळशी, ता. जि.औरंगाबाद) अशी मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. रवी भाऊसाहेब मुरकुटे या तरुणाचा विवाह १ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. रवी आणि त्याचा मित्र मंगेशसह लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सिल्लोड येथून भोकरदनकडे मोटारसायकलने (क्र.एम.एच.२० सी.एल १४३ ) जात होता. प्रवासादरम्यान एकता पेट्रोलपंपाजवळ ते असताना एका वाहनास ते ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच समोरून आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.१७.टी.३६४८) त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार बाबा चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून रवी आणि मंगेशचे मृतदेह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालक युनूस चाँद तांबोळी (३२, रा.श्रीरामपूर, सिल्लोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणांना उडविणारा ट्रक हा सिपोरा (ता. भोकरदन) येथील रामेश्वर सहकारी साखर कारखाना येथून मळी घेऊन श्रीरामपूर येथे जात होता.
नवरदेवासह २ जण जागीच ठार
By admin | Updated: March 26, 2016 00:56 IST