कुरूंदा : वसमत - औंढा महामार्गावरील चौंढी कल्याण टोलनाका २००३ पासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत येणारे ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळात केली आहे. त्यात चौंढी कल्याण टोलनाक्याचा समावेश असून सध्या हा टोलनाका बंद करण्याचे कोणतेच आदेश आलेले नाहीत; मात्र पुणे येथील एका पथकाकडून टोलसंदर्भात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होण्याची शक्यता आहे. वसमत फाटा ते वाघी फाटा दरम्यानच्या २० कि.मी अंतरासाठी आंबाचौंढी गावाजवळ ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर मध्य प्रदेशातील एका कंत्राटदाराला २००२ मध्ये टोलनाका देण्यात आला. या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी ५५० लाख रूपये खर्च केले होते. २०१७ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली करण्यात येणार होती. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय विधीमंडळात सोमवारी घेतला. त्यामुळे हा टोलनाका कायमचा बंद होणार असला तरी सध्या हा टोलनाका सुरू आहे. अद्याप कोणताच लेखी आदेश व पत्र टोलनाका बंद करण्यासाठी आले नसल्याचे व्यवस्थापक त्रिपाठी यांनी सांगितले. दरम्यान चौंढी कल्याण टोलनाक्याचे सर्वेक्षण पुणे येथील एका पथकाकडून सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नेमकी किती आवक या नाक्यावर होते, त्याचे सर्वेक्षण केले जात आहे. (वार्ताहर)
चौंढीचा नाका होणार ‘टोलमुक्त’
By admin | Updated: June 12, 2014 00:28 IST