खुलताबाद : के्रन, दुचाकी अपघातात बहिरगावच्या तीन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१६) सकाळी ८.३० वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगावजवळील टाकळी फाटा येथे घडली. या घटनेमुळे बहिरगावकरांवर शोककळा पसरली आहे. बहिरगाव (ता. कन्नड) येथील संदीप प्रल्हाद शिरसाठ (३०), दत्तात्रय गणपत जाधव (२७), राहुल सुरेश पवार (२४) हे तिघे गुरुवारी बहिरगाव येथून दुचाकीवरून (क्र. एमएच-२० डीयू ९६१०) औरंगाबादेतील पंढरपूरकडे निघाले होते. गल्लेबोरगावलगत असलेल्या टाकळी फाट्याजवळ क्रेनने (क्र. एमएच-१८ एन ९६२५) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात संदीप शिरसाठ हा जागीच ठार झाला. तर दत्तात्रय जाधव व राहुल पवार हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ औरंगाबादेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. के्रनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक वाल्मीक कांबळे करीत आहेत.खुलताबादकडून कन्नडकडे जाणारा के्रन भरधाव वेगाने जात होता. चालकाचा के्रनवरील ताबा सुटल्यामुळे हे वाहन समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकले. दुचाकी १०० फूट फरपटत गेली. दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला.तिघेही जिवलग मित्र अपघातात मयत झालेले तिघे जिवलग मित्र होते, असे बहिरगाव येथील नागरिकांनी सांगितले.
क्रेन, दुचाकी अपघातात तीन युवकांचा मृत्यू
By admin | Updated: June 17, 2016 00:40 IST