श्यामकुमार पुरे■ सिल्लोड (जि. औरंगाबाद)
रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन शेतात जात असलेल्या शेतकर्याला तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध केले आणि त्याच्या डब्यात तिघांचे पोट भरले नाही म्हणून दुसर्या शेतकर्यांना फोन करून 'भूक लगी हैं, खाना लाओ, तब इसे छोड देंगे' अशी धमकी दिली. सिल्लोड तालुक्यातील घटांब्री शिवारातील या घटनेने खळबळ उडाली आहे.
घटांब्री येथील सुदाम रंगनाथ सुरडकर डबा घेऊन आपल्या शेतात जात असताना, तीन चोरट्यांनी आम्हाला भूक लागली आहे, तुझा डबा दे व तुझ्या मित्रांचे डबे मागव' आम्ही तुला काही करणार नाही, अशी धमकी दिली. मात्र घाबरलेला सुरडकर आरडाओरड करणार हे पाहून चोरट्यांनी त्याच्या तोंडाला रुमाल लावला. यामुळे तो बेशुद्ध झाला. शुद्ध आली तेव्हा शेतापासून दूर डोंगराच्या पलीकडे आमखेड्याच्या धरणाजवळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी तिघे चोरटे त्यांच्याजवळच होते. त्यांनी डबाही खाल्ला होता. एका डब्यात पोट भरले नाही म्हणून त्यांनी दुसर्या शेतकर्यांना डबा मागव म्हणून धमकावले. त्यावर सुदामने फोन केला. त्याने चोरट्यांनी मला पळविल्याचे सांगून त्यांना जेवणाचा डबा आणून दिला तर ते मला सोडतील, असे सांगितले. त्यावर एका चोरट्याने फोन घेऊन भूक लगी हैं, तुम्हारे डबे लेकर आओ, तब इसे छोड देंगे, हम इधर तालाब के पास थोडा पाणी हैं वहा हैं, असे सांगितले.
कोम्बिंग ऑपरेशन सुरू - पोलीस अधीक्षक
याबाबत औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले, तपासासाठी पोलीस पथक घटांब्री परिसरात पाठविण्यात आले आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. ते कुणीही असो त्यांचा शोध लवकरच लावण्यात येईल.
शिकारी असतील - सहायक निरीक्षक
चोरटे ओळख लपवितात. यांनी मात्र तसे काही केल्याचे दिसून येत नाही. ते कदाचित शिकारीही असतील. त्यांना भूक लागली असेल म्हणून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले. संधी साधून काढला पळ पाणी पिण्यासाठी चोरटे धरणाजवळ गेले असताना सुदाम यांनी तेथून धूम ठोकली. बेशुद्ध केल्यावर सुदामला आमखोरा धरणाजवळ कसे नेले हे मात्र समजू शकले नाही.
--------------
सिल्लोड तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांची एक टोळी घुसल्याची माहिती अजिंठा पोलिसांनी दवंडी देऊन गावागावात दिली होती. नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. भूक लागली म्हणून त्यांनी शेतकर्याला वेठीस धरले असेल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.