हिंगोली : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘जीवन अमृत’ योजनेंतर्गत एका तासाच्या आत आवश्यकता असेल त्या ठिकाणी रक्त पुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या १०४ या टोल फ्री क्रमांकावर केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर अख्ख्या मराठवाड्यातच बी पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा असल्याचे बुधवारी दिसून आले. राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच ‘जीवन अमृत सेवा’ ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास एका तासाच्या आत संबंधित गटाचे रक्त रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णापर्यंत पोहोचते केले जाते, असा शासनाचा दावा होता. त्या अनुषंगाने याबाबतची बुधवारी ‘लोकमत’ ने सत्यता पडताळून पाहिली. त्यामध्ये सदरील योजना प्रभाविपणे राबविण्यात येत असल्याचे दिसून आले. औंढा तालुक्यातील वसई येथे सगनराव यादवराव मगर (वय ६०) यांना हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी बी पॉझिटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता होती. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रक्त मिळावे, याकरीता पुरेपूर प्रयत्न केला; परंतु हे रक्त उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे त्यांनी हिंगोली येथील राष्ट्रवादीचे मनीष आखरे यांच्याशी संपर्क साधला असता आखरे, माधव कोरडे, केशव नाईक यांनीही प्रयत्न करून पाहिले; त्यांनाही यश मिळाले नाही. अशातच राज्य शासनाची जीवन अमृत ही योजना रक्त पुरवठा करण्यासाठी सुरू असल्याची बाब समोर आली. त्यानुसार १०४ टोल फ्री क्रमांकावर फोन करून रक्त मिळते का? यासाठी प्रतिसाद मिळतो का? याची शहानिशा करण्यासाठी सदर प्रतिनिधीने स्टिंग आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ४ वाजता हिंगोली येथून १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. हा फोन पुणे येथील जीवन अमृत योजनेच्या मुख्यालयात लागला. तेथे बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे समोरील व्यक्तीला सांगितले. त्यावेळी समोरील व्यक्तीने रूग्णाचे नाव, वय, कशासाठी रक्त हवे आहे, रूग्णालयाचा पत्ता, रूग्णालयाजवळची एखादी ओळखीची खूण आदींची माहिती विचारली. त्यानुसार त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानुसार समोरील व्यक्तीने ६ हजार १२२ हा नोंदणी क्रमांक दिला व काही वेळात परत फोन करतो, असा निरोप दिला. त्यानुसार ४ वाजून १२ मिनिटांनी पुन्हा संबंधिताच्या मोबाईलवर पुण्याहून फोन आला. त्यामध्ये बी पॉझिटिव्ह रक्तगट हिंगोलीत नसल्याचे सांगण्यात आले. हवे असलेल्या ठिकाणापासून ४० कि. मी. पेक्षा अधिक अंतर असेल तर स्वत: रूग्णांच्या नातेवाईकांना रक्त जावून आणावे लागेल, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यावर मराठवाड्यात तसेच वाशिम, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यात कोठेही बी पॉझिटिव्ह रक्त असेल तर जाऊन आणण्याची तयारी दर्शविली असता, समोरील व्यक्तीने अन्य ठिकाणी उपलब्ध असलेल्या रक्ताची माहिती काही वेळात देतो, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ४ वाजून २५ मिनिटांनी पुन्हा पुण्याहून संबंधित व्यक्तीचा फोन आला. मराठवाड्यात कोठेही बी पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध नसल्याचे सांगितले. तशीच स्थिती वाशिम व अन्य ठिकाणची असल्याचे सांगितले. बी पॉझिटिव्ह रक्त असलेला रक्तदाता शोधा व रक्त उपलब्ध करून घ्या, अशी सूचना संबंधिताने दिली व फोन ठेवला. त्यामुळे राज्य शासनाने सुरू केलेली जीवन अमृत ही योजना प्रभावीपणे सुरू असल्याचा प्रकार स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आला. (जिल्हा प्रतिनिधी)रक्तदात्यांना आवाहन...वसई येथील सजगराव यादवराव मगर यांना बी पॉझिटिव्ह या रक्ताची तातडीने आवश्यकता आहे. त्यामुळे संबंधित गटाच्या रक्तदात्यांनी जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विठ्ठल करपे यांनी केले आहे. रक्ताचा सर्वत्र तुटवडासध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत. त्यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हा रूग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विठ्ठल करपे यांनी सांगितले. जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या कसल्याही गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले. १४ जून जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहनही डॉ. करपे यांनी केले.उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरे होईनातजीवन अमृत योजना...१०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास एका तासाच्या आत ४० कि.मी. अंतरापर्यंत शासकीय यंत्रणेकडून आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध करून दिले जाते. सध्या रक्ताच्या एका बॅगेला खासगी रक्तपेढ्यांमधून १२०० ते १३०० रुपये घेतले जातात. या योजनेत मात्र स्वत: रूग्णाचा नातेवाईक शासकीय रूग्णालयातून रक्त घेऊन जात असेल तर ४५० रुपये सेवा शुल्क आकारले जाते आणि इच्छित ठिकाणी रक्त उपलब्ध करून द्यायचे असेल तर वाहतूक खर्च म्हणून अधिकचे ५० रुपये प्रशासनाकडून आकारले जातात.ग्रामीण भागातील रूग्णांना कमी दरात व लवकरात लवकर सुरक्षित रक्त मिळण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली योजना.योजनेची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही? हे पाहण्यासाठी योजनेच्या १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून करण्यात आले स्टिंग आॅपरेशन.स्टिंग आॅपरेशनमध्ये पुणे येथील संबंधित यंत्रणा सतत सजग असल्याचे आले निदर्शनास.शासनाने उदात्त हेतूने योजना सुरू केली असली तरी उन्हाळ्यामध्ये सर्वत्रच रक्ताचा तुटवडा असल्याचे आले दिसून.
अख्ख्या मराठवाड्यात ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त मिळेना
By admin | Updated: June 12, 2014 00:28 IST