( वर्धापनदिन जाहिरात पुरवणीसाठी मॅटर )
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात लोकांना जसे स्वतःच्या घराचे महत्त्व पटले, तसेच ''''वर्क फ्रॉम होम''''मुळे वास्तू रचनेत बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली. त्यानुसार बदल करण्यात येऊ लागले. आर्किटेक्टही त्या घरातील जास्तीत जास्त जागेचा वापर कसा होईल, याकडे जास्त लक्ष देत आहेत.
कोरोनाआधी बांधकाम प्रकल्पात ग्राहकांना आधुनिक सोईसुविधा दिल्या जात होत्या; पण कोरोना महामारीमुळे दीर्घ लॉकडाऊन सुरू राहिले व त्या काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंग, घरात येताना हात-पाय धुणे, वर्क फ्रॉम होम यामुळे घरात आणखी नवीन सुविधा निर्माण करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यानुसार वास्तूमध्ये बदल केले जात आहेत. ग्राहकांच्या गरजा ओळखून बांधकाम व्यावसायिक आता नवीन गृहप्रकल्पात नवीन सुविधा देत आहे. यासंदर्भात शहरातील ज्येष्ठ कन्सलटिंग इंजिनिअर मोहंमद युनूस यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात सर्व लोक घरातच होते. निरोगी शरीर हीच संपत्ती याचे महत्त्व कळल्याने लोकांना घरात तसे वातावरण निर्माण करावे, अशी मानसिकता तयार होऊ लागली आहे. त्यादृष्टीने घराच्या रचनेत बदल केले जात आहेत.
वास्तूमध्ये करण्यात येत असलेले बदल पुढीलप्रमाणे -
१) जे ''''वर्क फ्रॉम होम'''' करत आहेत, त्यांना घरात ऑफिस कामासाठी छोटीशी जागा किंवा रूमची आवश्यकता जाणवू लागली आहे. ड्रॉईंग रूमच्या बाजूला लागूनच ऑफिस तयार केले जात आहे. जिथे काम करताना कोणताच अडथळा होणार नाही, अनेकदा उठावे लागणार नाही, अशी रचना केली जात आहे.
२) घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूलाच वॉशिंग प्लेस तयार केले जात आहे. तेथे नळाचे कनेक्शन देऊन येणारा प्रत्येक व्यक्ती हात-पाय धुऊन, सॅनिटायझर लावूनच घरात प्रवेश करेल अशी यामागील भूमिका आहे.
३) सोसायटीमध्ये सिक्युरिटी कॅबिनच्या बाजूलाही वॉशिंग प्लेस तयार केली जात आहे. जिथे हात-पाय धुणे व सॅनिटायझर लावता येईल अशी व्यवस्था केली जात आहे.
४) लॉकडाऊनआधी शहरात अपार्टमेंटमध्ये खालच्या मजल्यावर राहण्याची मानसिकता होती. त्यात तळमजला, पहिला मजला, दुसऱ्या मजल्याला प्राधान्य दिले जात होते; पण आता मुंबई, पुणेसारखे औरंगाबादेतही वरच्या मजल्यावर राहण्यास प्राधान्य देत आहेत. कारण जसजसे वरच्या मजल्यावर जातो, तसतसे ध्वनी व वायू प्रदूषण कमी होते. या कारणाने वरच्या मजल्यावरील फ्लॅटला मागणी वाढत आहे.
५) खिडक्या झाल्या मोठ्या. लॉकडाऊनआधी घरातील खिडक्या ४ बाय ४ फूट किंवा ५ बाय ४ फूट अशा असत. मात्र, आता घर हवेशीर पाहिजे, घरात सूर्यप्रकाश जास्त यावा, या कारणमुळे आता खिडकीचा आकार १० बाय ४ फूटपर्यंत वाढविला जात आहे. आता भिंतीऐवजी खिडकी लावली जाते आहे.
६) घरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. यामुळे काही एकत्र कुटुंबही विभक्त होत आहेत. फ्लॅट, रोहाऊसमध्ये राहिण्यास जात आहेत किंवा प्लॉट घेऊन त्यात मोठा बंगला बांधत आहेत. त्यात खोल्या असतील असे डिझाइन बनून घेतले जात आहेत. हे बदल लॉकडाऊननंतर पाहण्यास मिळत आहेत.
बदलत्या गरजा विचारात घेऊन घराचा नकाशा तयार केला जात आहे.