मन-कल्पना बोडीत ना । करित शरिराची विटंबना ।।१।। चारा वर्षाची पर्थणी ।। केस वोडून नासले पाणी ।।२।। कामे अभिलासी नरनारी । काय करिल काशी गोदावरी? ।।३।।विधि, प्रयाग वांया गेले । काग, बग गोंदी नाहाले ।।४।।शेख महंमद हुदई चांग । गोदा, वाराणसी अष्टांग ।।५।।शरीराच्या पावित्र्याबरोबरच मनाचं पावित्र्यही महत्त्वाचं आहे, इतकंच नव्हे, तर तसेच अधिक महत्त्वाचं आहे, याविषयी संत कवी शेख महमदांनी या अभंगात विवेचन केलेलं आहे. उपासना करण्याचे तीन मार्ग आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे ते तीन मार्ग होत. खरं तर, हे तिन्ही मार्ग एकमेकांना पूरक असेच आहेत, पण काही वेळेला त्यांचा उपयोग एकारल्यासारखा होतो. ज्ञानमार्गी पोथीपांडित्याच्या मागं लागले, कर्ममार्गी कर्मठ होऊन केवळ कर्मकांडी झाले किंवा भक्तिमार्गीयांनी डोळस होऊन भक्तीचा स्वीकार केला नाही, तर निखळ साधना किंवा उपासना होणार नाही आणि या सर्वांच्या मागं मनाच्या शुचितेचं अधिष्ठान असणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ मुंडन करून किंवा गंगेत वा गोदावरीत स्नान करून आपण पवित्र झालो, असं कुणाला वाटत असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. शेख महंमद म्हणतात, की असे तर कावळे नि बगळेदेखील या नद्यांत स्नान करतात. मन पवित्र नसेल तर आणि मनात वासना असेल तर अशा स्नानाचा काय उपयोग? अशी माणसं काशी किंवा प्रयागसारख्या तीर्थांना गेली, तरी ती अशुद्धच राहतील. मन पवित्र नसेल, तर या सर्व गोष्टी व्यर्थ होत. ज्ञानदेवांनीदेखील शुचितेची व्याख्या करताना तिची तुलना सूर्याशी केली आहे. ते म्हणतात, सूर्य हा जसा अंतर्बाह्य तेजस्वी असतो, तसं साधकाचं किंवा भक्तांचं अंत:करणही पवित्र असावं नि शरीरही पवित्र असावं.
अध्यात्म-डॉ. यू. म. पठाण सुचिता...
By admin | Updated: May 6, 2014 10:52 IST