कळमनुरी : मागील एक महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाच्या तिव्रतेने उपलब्ध जलस्त्रोत आटून गेले आहेत. काही गावांत पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना बसत आहेत. त्यामुळे सहा गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव कळमनुरी पंचायत समितीला सादर करण्यात आले आहेत. येथील पंचायत समितीचा सांभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा प्रशासनाने ४० लाख ९८ हजारांचा मंजूर केला आहे. तालुक्यातील साईनगर कळमनुरी व खापरखेडा या दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव तर करवाडी, बेलमंडळ, निमटोक, रूपूर, किल्लेवडगाव, कुंभारवाडी तर्फे चाफनाथ या सहा गावांचे विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेले आहेत. साईनगर कळमनुरी येथील टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहेत. एक महिना उलटून गेला तरीही येथे टँकरने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अधिग्रहणासाठी करवाडी व निमटोक या दोन गावांचे आदेश तहसीलदारांकडून प्राप्त झाले आहेत. तालुक्यात १ हजार १४६ हातपंप आहेत. त्यापैकी २७८ हातपंप पाण्याअभावी तर ३३ हातपंप दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. तालुक्यातील २० च्या जवळपास गावात पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)
अधिग्रहणासाठी सहा प्रस्ताव
By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST