लालखाँ पठाण , गंगापूरतालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना १४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र यातील अर्धे टँकर गंजलेले आणि ठिकठिकाणी छिद्रे पडलेले असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टँकरची क्षमता १२ हजार लिटरची; मात्र प्रत्यक्षात ६ ते ७ हजार लिटरच पाणी नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे गळके टँकर तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील १०६ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे १३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ठिकठिकाणी उपलब्ध जलसाठ्यातून दिवसभरात २७७ खेपांद्वारे नागरिकांची तहान भागवली जाते. काही दिवसांत तालुक्यात २०० टँकरदेखील कमी पडणार असल्याचे चित्र सद्य:स्थितीवरून दिसत आहे.विविध गावांत टँकर सुरू करण्यात आले आहेत. यात बहुतांश टँकरला अनेक ठिकाणी मोठमोठी छिद्रे पडलेली आहेत. पाणी भरल्यानंतर इच्छितस्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यातील ३० ते ४० टक्के पाणी रस्त्यावरच सांडले जाते. परिणामी पाण्याची वाट पाहत, असणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. यास पाणीपुरवठा विभाग जबाबदार असून, त्यांच्यात आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी टँकर लॉबीला अभय दिले जाते का, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक लोकांना पाणी मिळत नाही; मात्र शासन दरबारी अमुक गावाला पाणी पोहोच केल्याची नोंद मात्र तात्काळ केली जाते. टँकर सुरू करताना त्याची क्षमता तपासली जात नाही, १२ हजार लिटर क्षमतेच्या नावाखाली मंजूर झालेल्या टँकरमधून प्रत्यक्षात केवळ आठ ते दहा हजार लिटर पाण्याचीच वाहतूक होते.
गळक्या टँकरचा रस्त्यावर सडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 00:56 IST