लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात रस्ता अनुदान व आमदार निधीतून झालेल्या रस्त्यांची कामे पुन्हा नगरोत्थान योजनेतून केल्याचे दर्शविण्यात येत आहेत. यातून जनतेचा कोट्यवधी रुपये हडप केले जात असल्याचा आरोप मनपाचे विरोधी पक्षनेता प्रमोद खेडकर यांनी पत्रपरिषदेत केला़जेएनयुआरएम, बीएसयुपी, नगरोत्थान योजनेतील कामासाठी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन, सदर योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करणे. झालेल्या कामांच्या देखभालीसाठी तसेच अमृत योजनेच्या लोकवाट्याची रक्कम भरण्यासाठी महापालिकेच्या दीडशे कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. हुडकोने हे कर्ज देण्यास संमतीही दिली आहे. दुसरीकडे नगरोत्थान योजनेतून १६ कोटी रुपयांच्या कामांना सत्ताधाऱ्यांनी २७ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिल्याचा ठराव परस्पर आयत्यावेळी मंजूर केला आहे. कामे झालेली असतानाही ती कामे प्रस्तावित करुन निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. शिवाजीनगर, शोभानगर, पौर्णिमानगर याच भागात ही कामे घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीडशे कोटी रुपयांच्या कर्जातून कामे घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. २७ फेब्रुवारी रोजीच्या मूळ विषयपत्रिका व पुरवणी विषयपत्रिकेतही १६ कोटींच्या कामावर कोणतीच चर्चा झाली नाही. त्या सभेनंतर दोन सभा झाल्या. त्या सभेतही कोणताही प्रस्ताव नव्हता. परंतु ५ जून रोजी महापौरांनी २७ फेब्रुवारी या मागच्या तारखेतील सर्वसाधारण सभेत १६ कोटींची कामे मंजूर केल्याचा ठराव प्रशासनाकडे पाठवून सभागृह व जनतेची फसवणूक केल्याचा आरोप खेडकर यांनी केला. मागच्या दोन वेगवेगळ्या सभेत रस्ते अनुदान आणि दलित वस्ती सुधार योजनेत महापौरांच्या प्रभागात मंजूर केलेली काही कामेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
झालेल्या कामांचाच पुन्हा प्रस्ताव
By admin | Updated: June 13, 2017 00:41 IST