औरंगाबाद : कोरोनाकाळात जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना झाल्याचे आठवी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरल्यावर समोर आले. काही ठिकाणी विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र आढळून आले. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांत बालविवाहासंदर्भात जनजागृती करून बालविवाह रोखण्याचे प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक बुधवारी पार पडली. यात जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आलेल्या अडचणी, आव्हाने व ऑनलाइन शिक्षण, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. तब्बल दीड वर्षांनंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये कोरोनाचे झालेले परिणाम दिसल्याने शाळांतील शिक्षकही चक्रावले होते. विद्यार्थिनींचे लग्न झाल्याच्या घटना समोर आल्याने जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडून गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून जनजागृतीसंदर्भात सूचना दिल्या, तर जिल्हा परिषदेकडूनही गट शिक्षणअधिकारी, मुख्याध्यापक, वर्गशिक्षकांनी विद्यार्थिनी विद्यार्थ्यांत बालविवाहाबद्दल जनजागृती करून बालविवाह होणार नाही यासाठी काळजी घेण्याबद्दल सूचना दिल्याचे गलांडे यांनी सांगितले.