वाढवणा बु़ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अजब कारभाराची ओळख सर्वांनाच आहे़ त्यात या खात्याने तर चक्क कळसच काढला़ चक्क महाराष्ट्रातच म्हणजे वाढवणा बु़ येथे राज्याची हद्द समाप्तीचा फलक लावला़ कार्यालय किती कर्तव्यदक्ष आहे, हे सर्वांनाच दाखवून दिले़उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ येथून जळकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य हद्द समाप्ती’ असा फलक गेल्या २ महिन्यापूर्वी लावला़ या फलकावर आजपर्यंत औषधी कंपनीच्या जाहिरातीचे कागदी फलक असल्यामुळे या फलकावर काय लिहिले ते कोणासही दिसले नाही़ पण आता तो फलक चक्क मोकळा झाला असून, त्यावरील सर्व मजकूर स्पष्ट दिसत आहे़ वास्तविक पाहता वाढवण्याच्या पुढे जळकोट तालुका, नंतर मुखेड तालुका, नंतर बिलोली, नंतर नांदेड जिल्हा संपल्यानंतर म्हणजेच वाढवण्यापासून जवळपास २०० कि़मी़ अंतर कापून गेल्यानंतर आंध्र प्रदेशाची हद्द चालू होते़ मग महाराष्ट्र तब्बल २०० कि़मी़ शिल्लक असताना या खात्याने हा फलक वाढवण्यालगत लावण्याचे कारण तरी काय? असा प्रश्न या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे़ याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता संजय चाफुले यांच्याशी संपर्क साधला असता ही चुक सार्वजनिक बांधकाम विभागाची असून हा फलक लवकरात लवकर हा फलक काढून टाकून नागरिकांचा गैरसमज दूर करू, या भागातील प्रवाशांना गैरसोयीबद्दल झालेल्या मन:स्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले (वार्ताहर)
सार्वजनिक बांधकाम खात्याने महाराष्ट्र राज्याचे क्षेत्र घटवले
By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST