बालासाहेब काळे, हिंगोली पारंपरिक पिकांऐवजी अनेक शेतकर्यांनी नगदी पीक म्हणून रेशीम शेतीची कास धरली आहे. हिंगोली जिल्ह्यात रेशीम शेती करणार्या शेतकर्यांची संख्या वाढत असून २०१४-१५ या वर्षात सव्वाशे शेतकरी १४० एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करणार आहेत. विशेष वडहिवरा या गावातच १२५ या वार्षिक उद्दिष्टापैकी ७५ एकरावर तुती लागवडीसाठी शेतकर्यांनी नावनोंदणी केली आहे. जिल्ह्यात तुती लागवडीखालील क्षेत्र जवळपास १०० एकर असून हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांनी मिळवलेल्या चांगल्या उत्पन्नामुळे रेशीम शेतीचे महत्व इतर शेतकर्यांनाही पटू लागले आहे. शासकीय स्तरावर अनेक प्रोत्साहनपर योजना शेतकर्यांना मदतीचा हात देत आहेत. जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत गावोगावी मेळावे, चर्चासत्र घेऊन चांगली जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी वैजनाथ भांगे, क्षेत्रीय सहाय्यक अधिकारी बालासाहेब बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी रेशीम शेती यशस्वीरित्या करीत आहेत. रेशीम शेती ही पूर्णत: तांत्रिक बाबींवर आधारलेली आहे. तांत्रिक बाबी एकदा लक्षात आल्या की या शेतीमध्ये फारसे अवघड काही नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. पाण्याची होणारी बचत हे रेशीम शेतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच एकदा तुती लागवड केल्यानंतर साधारणत: १२ वर्षापर्यंत लागवड करण्याची गरज नसते. शेणाव्यतिरिक्त इतर कोणतेही खत या शेतीला लागत नाही. तुतीचा पाला जेवढा कसदार, तेवढा जास्त फायदा या शेतीतून होतो. शासनस्तरावर रेशीम शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात असून चांगले अनुदानही देण्यात येते. आता रेशीम कोष खरेदी करण्यासाठी व्यापार्यांची संख्या वाढल्याने रेशीम शेतीला चांगले दिवस आले आहेत. कर्नाटकातील रामनगर ही रेशीम कोषांची देशातील मोठी बाजारपेठ आहे. महाराष्टÑातील ९९ टक्के रेशीम कोषांची रामनगरच्या बाजारात विक्री होते. हिंगोली जिल्ह्यास २०१४-१५ वर्षासाठी १२५ एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या ३ महिन्यांच्या कालावधीतच तुतीची लागवड केली जाते. यंदा ३१ मार्चपर्यंत जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडे तब्बल १२० शेतकर्यांनी नावनोंदणी केली आहे. त्यानुसार सेनगाव तालुक्यातील ७० शेतकरी ७८ एकरवर, कळमनुरी तालुक्यातील १५ शेतकरी २१ एकरवर, हिंगोली तालुक्यातील २२ शेतकरी २६ एकरवर आहण वसमत तालुक्यातील १० शेतकरी १५ एकरवर अशी एकूण १४० एकरवर तुतीची लागवड करणार आहेत. सेनगाव तालुक्यातील वडहिवरा या एकाच गावात सर्वाधिक ७५ एकरावर तुती लागवड केली जाणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ८५ शेतकर्यांनी ९२ एकरवर तुती लागवड केली होती. त्यातील ८२ एकरवर ७३ हजार अंडीपुंजांचे संगोपन करण्यात आले. सरासरी एकरी ४५० अंडीपुंज तयार करून त्यामधून सुमारे १५ टन रेशीम कोषांचे उत्पादन घेण्यात आले. त्याची किंमत ४५ लाख एवढी होती. यातील केवळ ११० किलो रेशीम कोष महाराष्टÑ शासनाने खरेदी केले. उर्वरित संपूर्ण माल शेतकर्यांनी रामनगरच्या बाजारपेठेत नेऊन विकला. या रेशीम कोषांना सरासरी ३०० रूपये प्रतिकिलो, जास्तीत जास्त ४६५ रूपये प्रतिकिलो भाव मिळाला. यात कमीतकमी २९० रूपये प्रतिकिलो दर होता. मागील वर्षात २६ शेतकर्यांना रेशीम शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच २२ शेतकर्यांचा औरंगाबाद, जालना, पैठण, मंठा येथे अभ्यासदौरा काढण्यात आला. २०१३-१४ या वर्षामध्ये १७ शेतकर्यांना रेशीम कीटक संगोपनगृहासाठी एकूण १७ लाख ३ हजार ५६३ रूपये अनुदान देण्यात आले. तसेच तुती लागवड योजनेअंतर्गत २६ शेतकर्यांना १ लाख ५३ हजार ५५७ रूपये अनुदान नवीन लागवडीचा खर्च म्हणून देण्यात आले. शेडसाठी १७ शेतकर्यांना १५ लाख ५० हजार रूपयांचे अनुदानही जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना मिळाली असून अनेक शेतकरी त्याकडे वळत असल्याने लवकरच रेशीम धाग्यांमुळे शेतकर्यांच्या जीवनात समृद्धी आल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे. तुती बेणे लागवडीसाठी शेतकर्यांना जिल्हा रेशीम विकास कार्यालयात ५०० रूपये भरून नावनोंदणी करावी लागते. अंडीपुंजासाठी ७५ टक्के अनुदान शासनाकडून मिळते. त्यामुळे १०० ते २०० रूपयांत अंडीपुंज शेतकर्यांना उपलब्ध होतात. कीटक संगोपनासाठी (२० फूट बाय ५० फूट आकार) एक लाख रूपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. ठिबक सिंचनासाठी प्रतिएकर २० हजार रूपये अनुदान शासनाकडून देण्यात येते. तसेच ५० हजार रूपयांचे रेशीम शेतीस लागणारे साहित्य १२ हजार ५०० रूपयांमध्ये उपलब्ध करून दिले जाते. रोजगार हमी योजनेतून प्रतिएकर २० हजार रूपये अनुदान देण्यात येते. पहिल्या वर्षी ६ हजार रूपये मजुरी व ८ हजार रूपये साहित्य स्वरूपात तर दुसर्या आणि तिसर्या वर्षी मजुरीसाठी ३ हजार रूपये अनुदान दिले जाते.
रेशीम शेतीची कास धरल्यामुळे समृद्धी
By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST