छत्रपती संभाजीनगर : येथून पुण्याकडे जाणाऱ्या विद्यमान चौपदरी मार्गावर सद्यस्थितीत प्रचंड खड्डे झाले आहेत. तसेच पुणे ते अहिल्यानगरपर्यंत प्रचंड वाहतुकीची कोंडी नेहमीची झाली असल्यामुळे त्याचा फटका उद्योगांना बसतो आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आगामी काळात उद्योग येणार आहेत. त्यामुळे नवीन प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस वे चे काम पूर्ण होईपर्यंत विद्यमान मार्गावरच येथील उद्योग व इतर सामान्य वाहतुकीला अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे हा मार्ग मजबूत करण्यासह वाहतुकीच्या कोडींतून मुक्त केल्यास उद्योगांना चालना मिळेल, असे मत शुक्रवारी ऑरिक सिटी येथे शेंद्रा-बिडकीन उद्योग वसाहतीतील अडचणींबाबत संवाद बैठकीत उद्योजकांनी मांडले.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह डीएमआयसी सहव्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, एमआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, व्यवस्थापक महेश पाटील, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, निलम बाफना आदींची उपस्थिती होती. यावेळी मासिआ व इतर उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींनी अडचणी मांडल्या.
१०० कि.मी. अंतरातील मार्गावर खड्डेछत्रपती संभाजीनगर ते पुणे या विद्यमान मार्गावर जिल्ह्याच्या हद्दीतील अनेक भागात खड्डे आहेत. तसेच पुढे अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत हा रोड प्रचंड खराब झालेला आहे. विशेषत: नगर शहरात व दौंड चौफुलीपर्यंतचा रस्ता पूर्ण खराब व वाहतूक कोंडीचा झालेला आहे. पुण्यापर्यंत वाहतूक खोळंबलेली असते.
वाहतूक काेंडीतून दिलासा देण्यासाठी सूचनाछत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्यावरील वाहतूक सुलभ व्हावी, यादृष्टीने नियोजन करावे, तसेच वाहतुकीसाठी सुरळीत होण्यासाठी उपाययोजना हाती घेऊन उद्योगांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयीन स्तरावर याबाबत पत्रव्यवहार केला जाईल. नवीन एक्सप्रेस-वे चे अलायन्मेंट सुरू झाले आहे. त्याचा आढावा शुक्रवारी घेतला.- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त
दोन दिवसीय शिबिर घेणारशेंद्रा-बिडकीन येथील उद्योजकांच्या प्रशासकीय प्रलंबित विषयांबाबत दोन दिवसीय शिबिर घेत त्या सोडविण्यात येतील. जिल्हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासोबतच उद्योग वाढीसाठी प्रशासन उद्योजकांसोबत आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी