लातूर : ‘लोकसंस्कृतीमध्ये सोवळं-ओवळं नसतं. प्रतिगामी आणि घातक परंपरा असतानाही लोकसाहित्य माणूसकेंद्री राहिले आहे. त्यातल्या दोषांना काढून मानवकेंद्रित विचारधारेने लोकसाहित्याचा अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी लातूर येथे बोलताना केले.येथील डॉ. रामशेट्टी शेटकार व प्रा. बालाजी शिंदे यांनी संपादित केलेल्या ‘लोकसाहित्य : काल, आज आणि उद्या’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सरस्वती संगीत महाविद्यालयात आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राम बोरगावकर, ललिता सबनीस, डॉ. विठ्ठल लहाने, मंगेश बोरगावकर, डॉ़राजशेखर सोलापुरे, प्राचार्य डॉ.आर.एम. चौधरी, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. अशोक नारनवरे, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते. सबनीस पुढे म्हणाले, लोकसंस्कृती ही लोकसाहित्यातून व्यक्त होत असते. लोकसाहित्यावरील ६७२ पानांचे संपादित केलेले नव्या व जुन्या साहित्यिकांचा समन्वय असलेले बहुदा मराठी साहित्यातील हे पहिलेच पुस्तक असावे. याने सर्व जाती-धर्माच्या लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा वाचकांपुढे मांडला आहे. यात ८६ लेखकांचे लेख आहेत. लोक साहित्यात धर्मनिरपेक्षता ठासून भरलेली असते. धर्म आणि जातीच्या पलिकडे जाऊन खऱ्या अर्थाने लोकसंस्कृती व्यक्त करणारे हे पुस्तक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी डॉ. लहाने यांनी आई-वडिलांची सेवा करा. आईचे चरणस्पर्श करा. त्यातून मिळणारा आनंद हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. त्याचा दैनंदिन आनंद घ्या, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. रामशेट्टी शेटकार, प्रा. बालाजी शिंदे, डॉ. मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. अशोक नारनवरे आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ. राम बोरगावकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुदाम पवार यांनी केले. आभार डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. श्रीपाल सबनीस हे निवडीनंतर पहिल्यांदाच मातृभूमीत आले. सरस्वती संगीत कला महाविद्यालयाच्या कलाभूमीत रंगलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भूमिपुत्राचा निवडीनंतर पहिलाच सत्कार झाला. तो मनोभावे स्वीकारत श्रीपाल सबनीस यांनी कलावंताला कलावंताची कदर असते. हारतुऱ्यांच्या सत्कारापेक्षाही पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संमेलनाध्यक्ष म्हणून मला महत्त्वाचा वाटतो. त्यात मायभूमीतील हा सोहळा आणि सत्कार याने मी भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसंस्कृतीमध्ये सोवळं-ओवळं नसतं
By admin | Updated: November 25, 2015 23:19 IST