औरंगाबाद : जगभरात कोराेनाचा विळखा कमी होण्याची आशा असतानाच ब्रिटनमधील नव्या विषाणूच्या जन्माने नवे संकट उभे राहिले. या सगळ्यात जर्मनीतील ६ रुग्णांनंतर भारतात पहिल्यांदाच औरंगाबादेत कोरोना होऊन गेलेल्या महिलेच्या शरीरात मणक्यासह विविध अवयवांत पस (पू) झाल्याचे आढळले. एमआरआय तपासणीतून ही बाब उघड झाली. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न, ३ शस्त्रक्रिया आणि २१ दिवसांच्या उपचारानंतर ही महिला रुग्णालयातून चालत घरी गेली.मणक्याची शस्त्रक्रिया ३ तास चालली. दुसरी आणि तिसरी शस्त्रक्रिया अनुक्रमे दीड आणि एक तास चालली. शहरातील न्यू बालाजीनगरातील ३९ वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून पाठदुखी, कंबरदुखीने त्रस्त होती. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील मणकाविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत दहिभाते यांच्याकडे उपचार सुरू असताना ‘एमआरआय’द्वारे तपासणी करण्यात आली. त्यांच्या मणक्यात, पोटात, दोन्ही हातांत आणि शरीरातील अन्य भागांत पस झाल्याचे आढळले. डॉ. दहिभाते यांनी त्यांच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला. तेव्हा कोरोनामुळे असा परिमाण होत असल्याचे आणि आतापर्यंत जर्मनीत असे ६ रुग्ण आढळल्याचे समोर आले.
कोरोना होऊन गेला; पण कळलेही नाहीसदर महिलेला कोरोनाचे निदान झालेले नव्हते. शिवाय कुटुंबातही कोणाला कोरोनाची लागण झालेली नव्हती; परंतु ॲन्टी बाॅडी टेस्ट करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महिलेवर उपचाराचे आव्हान डॉक्टरांपुढे होते. ते आव्हान पेलत डॉ. श्रीकांत दहिभाते, डॉ. रजनीकांत जोशी आणि डॉ. प्रसाद वैद्य यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेचा जीव वाचविला.
५०० मि.ली. पस काढलासदर महिलेचा मणका आणि शरीरातील अन्य अवयवांतून तब्बल ५०० मि.ली. पस काढण्यात आला. मणक्याची शस्त्रक्रिया ३ तास चालली. दुसरी आणि तिसरी शस्त्रक्रिया अनुक्रमे दीड आणि एक तास चालली.
पूर्ण शरीरात संक्रमणमहिलेच्या पूर्ण शरीरामध्ये संक्रमण झाले होते. जीवाला धोका होता. तत्काळ शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरला होता. एक नाही, तर तब्बल तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. शेवटी २१व्या दिवशी आनंदी चेहऱ्याने रुग्ण चालत घरी गेला. कोरोना झाल्यानंतर मणक्यामध्ये आणि शरीरामध्ये असे संक्रमण होणारा हा जगातील ७वा आणि भारतातील पहिला रुग्ण आहे. - डॉ. श्रीकांत दहिभाते, मणकाविकारतज्ज्ञ