लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या बाळगोपाळांच्या दिंडीने मंगळवारी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शहरातील माळीगल्ली येथून या दिंडीला प्रारंभ झाला. विठ्ठल नामाचा जयघोष करीत निघालेल्या या दिंडीचा विद्यानगरातील रंगनाथ महाराज मंदिरात समारोप झाला.४ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास माळीगल्ली येथे अशोकराव सावरगावकर यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीचे पूजन करण्यात आले. विहिंपचे प्रांतमंत्री अनंत पांडे, बजरंग दलाचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर, जिल्हा संयोजक प्रकाश लाखरा, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, राजकुमार भांबरे, प्रल्हादराव कानडे, माऊली शिंदे, गोपाळ रोडे, एस. आर. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. माळीगल्ली येथून प्रारंभ झालेली ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गस्थ झाली. शहरामधील २० ते २५ शाळांमधील विद्यार्थी वारकऱ्यांचा वेष परिधार करुन दिंडीत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि बालगोपाळांच्या मुखातून होणाऱ्या हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. दिंडीमार्गावर ठिकठिकाणी स्वागत झाले. बालगोपाळांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
बालगोपाळांच्या दिंडीने दुमदुमली परभणी
By admin | Updated: July 4, 2017 23:49 IST