छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले खंडोबा मंदिर हे आजही हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचा जीर्णाेद्धार आणि पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून खोदण्यात आलेली बारव (पाण्याचा कुंड) हे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या समाजाभिमुख आणि दूरदृष्टीने केलेल्या कारभाराची साक्ष देतात.
अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी भारतभर विविध ठिकाणी मंदिरे, घाट, बारवा, विहिरी, धर्मशाळा अशा सार्वजनिक उपयोगाच्या वास्तूंचे निर्माण व पुनर्बांधणी केली होती. साताऱ्यातील खंडोबा मंदिर आणि त्याला लागून असलेली बारव ही त्याच कार्याची जिवंत साक्ष आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारवेमुळे त्या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली होती. बारव अजूनही वापरात असून, स्थानिक प्रशासनाने तिच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
इतिहास अभ्यासक डॉ. मोहित देसाई यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर यांचा प्रशासकीय कारभार केवळ धार्मिक नव्हे, तर सार्वजनिक विकास आणि पर्यावरणपूरक होता. त्यांनी जिथे मंदिरे उभारली, तिथे पाण्याची सोय केली. प्रवाशांच्या निवासासाठी धर्मशाळा बांधल्या. आजही राणी अहिल्याबाईंच्या कार्याचा ठसा देशभर अनेक स्थळांवर उमटलेला दिसून येतो. त्यांच्या या कारभाराची साक्ष देणारे साताऱ्यातील मंदिर व बारव असून, त्याचे जतन झाले पाहिजे.
मंदिराचे अर्धवट पडलेले काम शासन व पुरातत्व विभागाकडून सुरू झाले आहे. हे काम पारंपरिक वास्तुकलेच्या शैलीत करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थापत्यातील बारकावे जपण्यासाठी कुशल टीम काम करत आहे. मंदिराचे गतवैभव त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अहिल्यादेवींच्या स्मृतींना जतन करण्यासाठी ट्रस्टीदेखील सजग आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व पुरातत्व खात्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या वास्तूंच्या जतनासाठी संयुक्त प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांची आहे. पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व आहे. या ठिकाणाचा समावेश साताऱ्यातील पर्यटन नकाशात करून त्याचा विकास करणे शक्य आहे.- डॉ. विलास पारखे, धनगर समाजविषयक अभ्यासक