लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शेतजमिनीच्या वादातून वृध्दाचा विषारी औषध पाजून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वाघलखेडा येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील वाघलखेडा येथे मुळक व शेळके कुटुंबियांंमध्ये शेतजमिनीचा वाद होता. ३ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उत्तम शंकर मुळक (७०) व त्यांची सुन मंगलबाई पांडुरंग मुळक (३५) हे आपल्या शेतात काम करत असताना श्रीरंग हरीभाऊ शेळके, विष्णू श्रीरंग शेळके, कृष्णा श्रीरंग शेळके व परमेश्वर श्रीरंग शेळके (सर्व रा. वाघलखेडा) हे शेतात आले व हे शेत आमचे आहे असे म्हणून बळजबरीने नांगरणी करु लागले. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या उत्तम मुळक व मंगलबाई मुळक या दोघांना चारही जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांनी वृध्द उत्तम मुळक यांना पकडून बळजबरीने विषारी द्रव पाजल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विषारी द्रव शरीरात गेल्याने प्रकृती गंभीर झालेल्या उत्तम मुळक यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा ८ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात मृत्यु झाला. याप्रकरणी मंगलबाई पांडुरंग मुळक यांच्या तक्रारीवरुन श्रीरंग शेळके, विष्णु शेळके, कृष्णा शेळके व परमेश्वर शेळके या चौघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतीच्या वादातून वृद्धाचा खून
By admin | Updated: May 10, 2017 00:47 IST