विलास भोसले , पाटोदानवीन शैक्षणिक वर्ष व पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. प्रमुख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तर काही ठिकाणचे अधिकारी रजेवर गेले आहेत. अशा एक ना अनेक कारणाने सामान्यांची कामे मात्र रेंगाळली आहेत. गंभीर बाब म्हणजे महसूल राज्यमंत्र्यांच्या तालुक्याचीच अशी अवस्था असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पाटोदा तालुका हा महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. असे असतानाही येथील महसूल विभागातील अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे महसूल, कृषी, वीज वितरण, पंचायत समिती अशा महत्त्वाच्या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचे पद प्रभारी आहे. यामुळे सामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यांना आपल्या कामासाठी कार्यालयात वारंवार खेटे घालावे लागतात. यामुळे सामान्यांना आर्थिक भुर्दंड तर पडतोच शिवाय वेळेचाही अपव्यय होतो. वेळेवर काम होत नसल्याने ‘भीक नको पण; कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.येथे महसूल विभागाचे कार्यालय अलिकडेच सुरू करण्यात आले आहे. येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ यांची अवघ्या दहा महिन्यातच तडकाफडकी बदली करण्यात आली. तर तीन महिन्यांपूर्वीच तहसीलदार म्हणून आलेले दिनेश झांपले यांचीही उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे बदली करण्यात आली. शिरूर येथील तहसीलदार भारत सूर्यवंशी यांच्याकडे त्यांच्या पदाचा प्रभार देण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थी, पालक तहसीलमध्ये वारंवार खेटे घालीत आहेत. असे असतानाही त्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. तसेच हे दोन्ही अधिकारी नसल्याने महसूल प्रशासनास गोगलगायीची गती आल्याचे दिसून येत आहे. येथील कृषी विभागातील कृषी अधिकारी बिनवडे हेही दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांच्या पदभार पी.डी. देशपांडे यांच्याकडे देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे देशपांडेही रजेवर गेल्याने त्यांचा कारभार आता आर.एफ. शिदोरे यांच्याकडे आला आहे. शिदोरे हे ही रजेवर गेल्याने तालुका कृषी कार्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मार्गदर्शनासह इतर कामासाठी या कार्यालयात येत आहेत. मात्र त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. पाटोदा येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याची जागाही रिक्त आहे. त्यामुळे तेथेही अलबेल कारभार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पंचायत समिती कार्यालयातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. तेथेही अनेक जागा रिक्त आहेत. गटविकास अधिकारीही अवघ्या महिन्यातच निवृत्त होत आहेत. येथील काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे या कार्यालयालातही फारसे कामकाज होत नसल्याचे दिसून येत आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचीही जागा रिक्त आहे. यामुळे जनावरांवरही योग्य उपचार होत नाहीत. येथील वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांचा कारभार इतरच हाकतात. तालुक्यातील डोंगरकिन्ही व अंमळनेर येथेही वैद्यकीय अधिकारी नाहीत.तालुक्यातील अशा महत्त्वाच्या कार्यालयातील अनेक जागा रिक्त आहेत तर काही ठिकाणी अधिकारी रजेवर गेले आहेत. रिक्त जागेवर नवीन अधिकारी येण्यास धजावत नसल्याची चर्चाही तालुक्यात रंगत आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ म्हणाले, शासन आदेशाने कार्यवाही सुरू आहे. रिक्त जागांसंदर्भात संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.
अधिकारी रजेवर, कार्यालय वाऱ्यावर
By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST