अर्धापूर :अर्धापूर शहरासाठी नव्याने कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना मौजे जांभरुन येथील तलावातून प्रस्तावित करण्याच्या हालचाली नगर पंचायतच्यावतीने चालू झाल्या आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नव्याने कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गट क्रं. ५४८ मध्ये १४ हेक्टर पेक्षा जास्त तलावची जमीन उपलब्ध असताना गतवर्षी तलावाच्या अर्ध्या भागातीलच गाळ काढण्यात आला. तलावातील संपूर्ण गाळ काढल्यास तलावात कॅनालद्वारे उर्ध्व पैनगंगेचे पाणी जमा होऊन गावातील बोअरच्या पाण्याची पातळी वाढेल. तसेच प्रसिद्ध देवस्थान असलेले असहाबे रसूल दर्गाच्या पायथ्याशी असलेल्या सदरील तलावाचे सुशोभिकरण करुन लगत बगीचा तयार केल्यास या परिसरातील नागरिक या बगीचाचा लाभ घेतील. तलावात नौकाविहार केंद्र सुरू केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच शहरात रोजगारही उपलब्ध होईल. पर्यायाने नगर पंचायतचे उत्पन्न वाढेल. पण ३ कि.मी. अंतरावरील मौजे जांभरुन येथील तलावातून पाईपलाईन व पाणी पंप करण्यासाठी विजेचा खर्च व देखभाल खर्च नगर पंचायतीला परवडणारा नाही. पाण्याच्या स्तोत्राचा विचार केला असता मौजे जांभरुन व अर्धापूर तलावाला उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचेच पाणी मिळते. तसेच अर्धापूर शहरातील तलाव हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे सोयीस्कर जाईल. याबाबत सविस्तर चर्चा करुनच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना अंमलात आणावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर काही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना स्थानिक तलावाऐवजी मौजे जांभरुन येथील तलावातून करण्यासाठी नगरपंचायत स्तरावर हालचाली चालू आहेत. - अॅड. किशोर देशमुख (विरोधी पक्ष नेता, नगर पंचायत अर्धापूर) )
अर्धापुरला पाणीपुरवठ्यासाठी हालचाली
By admin | Updated: May 9, 2014 00:33 IST