पूर्णा : माहेराहून २ लाख रुपये घेऊन येण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळीने विवाहितेस कीटकनाशक पाजवून जीवंत मारण्याची घटना कात्नेश्वर येथे घडली. तालुक्यातील कात्नेश्वर येथील विवाहित महिला संगीता विष्णू चापके हिला माहेराहून २ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीने मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच माहेराहून पैसे का आणत नाही? म्हणून पती विष्णू सोपान चापके, सासरा सोपान विठ्ठल चापके, सासू गंगाबाई चापके व नणंद यांनी संगनमत करून संगीता हिला कीटकनाशक पाजले. ही घटना ४ जुलैच्या रात्री व ५ जुलै दरम्यान घडली. यामध्ये संगीता चापके हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संगीताचे वडील रामचंद्र हनुमंत बोखारे (रा. राहुटी बु. जि. नांदेड) यांच्या तक्रारीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा पोलिस ठाण्याचे प्रभारी व प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अशोक हाके, पो.कॉ. अनिल भराडे हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)पूर्णा पोलिसांत गुन्हा दाखल माहेराहून २ लाख रुपये का आणत नाही म्हणून पतीसह सासरा, सासू, नणंद यांनी संगनमत करून संगीता हिला कीटकनाशक पाजवून खून केला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यात विवाहित महिलेस जीवंत मारण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. पोलिसांच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याने कायद्याची भिती कोणालाच राहिलेली नाही. महिन्यातून तीन ते चार पेक्षा जास्त विवाहित महिलेस कीटकनाशक पाजणे, मारहाण करणे आदी घटना घडत आहेत. अशाविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे झाले आहे.
विवाहितेस पाजले कीटकनाशक
By admin | Updated: July 8, 2014 00:33 IST