औरंगाबाद : दुष्काळामुळे पाणीटंचाईबरोबरच जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा टंचाईमुळे चाऱ्याचे आणि ढेपेचेही भाव कडाडले आहेत. त्यामुळे जनावरांचा सांभाळ करणे अवघड झाले आहे. जनावरे विक्रीला नेली तरी बाजारात त्यांना खरेदीसाठी कोणी पुढे येत नसल्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत गाय, बैल, म्हैस संवर्गातील जनावरांची एकूण संख्या ६ लाख ८ हजार इतकी आहे. मात्र, गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रबीचे पीक झाले नाही. अनेक भागात खरिपाचे पीकही गेले. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीच नसल्यामुळे शेतीत चरण्यासाठी हिरवा चारा उपलब्ध नाही. दुसरीकडे कडब्याचे भावही वाढले आहेत. दोन तीन महिन्यांपूर्वी हजार रुपये शेकडा मिळणारा कडबा आता १६०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यासोबतच ढेपेचे भावही वाढले आहेत. सध्या पन्नास किलोचे ढेपेचे पोते १३०० रुपयांना मिळत आहे. यामुळे जनावरांचा सांभाळ करणे अवघड झाले आहे.शेतात चरण्यासाठी काही नाही. चारा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पशुपालक जनावरे विक्रीसाठी काढत आहेत. परंतु तेथेही गिऱ्हाईक मिळत नसल्याची परिस्थिती आहे. पूर्वी भाकड जनावरे कत्तलीसाठी खरेदी केली जात होती. मात्र आता गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे कत्तलीसाठीची खरेदीही बंद झाली आहे. अशा सर्वांमुळे ग्रामीण भागातील पशुपालक हैराण झाला आहे. जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला आहे.
पशुधन संकटात
By admin | Updated: April 21, 2016 00:37 IST