नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरु असून विद्यार्थ्यांना आॅनलाईन पेपर देण्यात येत आहेत़ सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवार, २३ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात विधी शाखेचा पेपर तब्बल ४० मिनिटे विलंबाने विद्यार्थ्यांच्या हाती पडला़ परीक्षा पद्धतीत आधुनिकता आणण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून विविध प्रयोग केले जात आहेत़ विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करत सत्र परीक्षेचे पेपर केंद्रावर प्रत्यक्ष न पाठवता प्राचार्य, परीक्षकांच्या नोंदणीकृत मेल आयडीवर पाठविले जात आहेत़ परीक्षा सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर त्या-त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा विभागाकडून आॅनलाईन पद्धतीने पाठविल्या जातात़ त्यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर केला जातो़ शनिवारी सकाळच्या सत्रात विधी शाखेचा पेपर सकाळी १० वाजता होणार होता़ मात्र प्रश्नपत्रिका विलंबाने प्राप्त झाल्याने नांदेड शहरातील एस़पी़ लॉ कॉलेज या परीक्षा केंद्रावर तब्बल ४० मिनिटे उशिराने प्रत्यक्ष परीक्षेस प्रारंभ झाला़ दुपारच्या सत्रात यशवंत महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विधी शाखा द्वितीय वर्षाची प्रश्नपत्रिका तब्बल एक तास उशिराने वितरीत झाली़ त्यामुळे या केंद्रावर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत परीक्षा घेण्यात आली़ कंधार येथील शिवाजी महाविद्यालयातही २० मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिकेचे वाटप झाली़ येथील विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त वेळ देण्यात आला़ असाच प्रकार परभणी, उदगीर व लातूर केंद्रावर झाल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले़ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात अडचण आल्याची माहिती परीक्षा केंद्रातून देण्यात आली़ वेळ होवूनही प्रश्नपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थ्यांची काही काळ तारांबळ उडाली़ दुपारच्या सत्रावर याचा परिणाम झाला़
विधी शाखेचा पेपर ४० मिनिटे विलंबाने
By admin | Updated: April 23, 2016 23:55 IST