दैठणा : परभणी तालुक्यातील आंबेटाकळी येथील दोन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून रस्ताच मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाता येत नसल्यामुळे कुटुंंंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आंबेटाकळी येथील अशोक मधुकर बेले व बालासाहेब मधुकर बेले या दोन शेतकऱ्यांचा २००५ पासून शेतातील रस्ता बंद करण्यात आला होता. परभणीचे तहसीलदार यांच्याकडे या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर गट क्रमांक ५२ व ५३ या सामूहिक धुऱ्यावरून रस्ता देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिले होते. मात्र माणिक विठ्ठल बेले, मारोतराव पुरभाजी बल्लाळ यांनी या रस्त्यावरून जाण्याची मनाई केली. औरंगाबाद आयुक्तालय यांना तक्रार करण्यात आली. या तक्रारीची चौकशी करून आयुक्तालयाने तहसीलदारांना कोर्ट अॅक्ट कलम ०५ प्रमाणे गट क्रमांक ५२ व ६१ या सामायिक रस्त्याने रस्ता देण्यात यावा, असा आदेश देण्यात आला. मात्र या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. याबाबत दैठणा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली, परंतु या तक्रारीली केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे दहा वर्षे उलटूनही या दोन शेतकऱ्यांना शेतातून जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. याचे सोयरसूतक तहसीलदार व पोलिस प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. अशोक मधुकर बेले यांची पाच एकर तर बालासाहेब बेले यांची ६ एकर जमीन शेतात जाता येत नसल्यामुळे पडीक राहिली आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)शेतरस्त्यावरून होत आहेत भांडणे जिल्ह्यात दरवर्षी शेत रस्त्यावरून अनेकांची भांडणे होत आहेत. शासन स्तरावरून शेत जमिनीची मोजणी स्वातंत्र्यानंतर एकदाच झाली आहे. त्यामुळे शेतरस्ते अंदाजे काढण्यात आली आहेत. परंतु आता शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने काही शेतकरी शेतरस्ते देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कसे जावे? असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतासाठी जाणाऱ्या शिवरस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे.
दहा वर्षांपासून शेतरस्ता मिळेना
By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST