विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुलगा-मुलगी यांच्यातील समानतेबद्दल कितीही प्रबोधन झाले, तरी मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी ही परक्याचे धन, हा समाजमनात रुजलेला गैरसमज काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचाच परिणाम म्हणून की काय, गेल्या दीड वर्षाचा काळ लोटला; पण ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणारे जिल्ह्यातील एकही दाम्पत्य समोर आले नाही.मुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, लिंग भेदभाव न करणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाते. ही योजना तशी १ एप्रिल २०१६ पासूनच सुरू झाली.सुरुवातीला दारिद्र्यरेषेखालील तसेच एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबेच या योजनेसाठी पात्र होती. अलीकडे १ आॅगस्ट २०१७ पासून या योजनेचे स्वरूप बदलले. आता ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत आहे, अशा कुटुंबांनाही या योजनेचा लाभ घेता येतो; पण एका मुलीनंतर किंवा दोन मुलींवर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे दाम्पत्यच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. नेमकी हीच अट योजनेसाठी मारक ठरली आहे.एकीकडे, काही दाम्पत्य मुलीच्या जन्माचे स्वागत करतात; पण मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे प्रकर्षाने टाळतात. जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहे.आपला देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत आहे; पण आजही समाजामध्ये १६ व्या शतकातील चालीरीती, रूढी-परंपरा घट्ट चिटकून आहेत. लग्न झाल्यावर आज ना उद्या मुलगी निघून जाईल. मग उतार वयात आपली काठी कोण होईल, ही मानसिकता समाजामध्ये आजही कायम आहे.काय आहेत योजनेचे फायदे‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेंतर्गत कुटुंबांना पहिल्या मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी ५ हजार रुपये, दुसरीही मुलगीच झाली, तर तिच्याही स्वागतासाठी अडीच हजार रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी व आई या दोघींच्या संयुक्त बँक खात्यात एका मुलीसाठी १ लाख रुपये, दोन्ही मुली असतील, तर दोघींच्या नावे प्रत्येकी एक-एक लाख रुपयांची ठेव ठेवली जाते. मुलीचे वय १८ वर्षांचे झाल्यास सदरील रक्कम बँकेतून काढता येईल. मात्र, तोपर्यंत मुलगी अविवाहित असायला हवी.मुलींवर समाधानी असणाºया कुटुंबांची वानवायासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले की, या योजनेसाठी एक किंवा दोन मुली असणाºया दाम्पत्यांनी अर्ज केले; पण प्राप्त अर्जांपैकी एकाही कुटुंबाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे प्राप्त अर्ज अवैध ठरले आहेत.योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात एकही लाभार्थी पात्र ठरलेला नाही. मुलगा जन्माला येईल, या आशेवर या कुटुंबांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया टाळलेली असावी, असा कयास काढला जात आहे.
जिल्ह्यात ‘भाग्यश्री’ कन्यांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:08 AM